पोटचेफ़्स्टरूम : जेंटलमन गेम म्हणून क्रिकेटची ओळख आहे. पण हल्ली स्लेजिंगचे क्रिकेटला ग्रहण लागले आहे. पण आता त्यातच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेमध्ये एक लाजीरवाणी घटना घडली आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाला तीन विकेटने पराभूत करत पहिल्यांदाच विश्वविजेते झालेल्या बांगलादेश संघाने मैदानातच राडा घातला. सामना जिंकल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की करत शिव्याही घातल्या. बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने या सगळ्या प्रकारानंतर माफी मागितली. असे म्हटले जात आहे की संपूर्ण प्रकरण आयसीसीने गांभीर्याने घेतले आहे.
अंतिम सामन्यात मैदानात चक्क बॅट आणि स्टम्प घेऊन बांगलादेशचे खेळाडू आले होते. मैदानात झालेल्या या राड्यात अखेर पंचांना हस्पक्षेप करावा लागला. खूपच आक्रमकता दाखवत प्रत्येक चेंडूनंतर बांगलादेशचे खेळाडू भारतीय फलंदाजाला सतत काहीतरी सांगत असत. बांगलादेश विजयाच्या जवळ आल्यानंतरही इस्लाम कॅमेर्यासमोर शिव्या घालताना दिसला.
Shameful end to a wonderful game of cricket. #U19CWCFinal pic.twitter.com/b9fQcmpqbJ
— Sameer Allana (@HitmanCricket) February 9, 2020
बांगलादेशी खेळाडू सामन्यानंतर खूप वाईट वागल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गने व्यक्त केले. दोन्ही संघांमध्ये सामन्याच्या सुरुवातीपासूनच तणाव होता. सामन्याच्या दुसऱ्या षटकात तन्झिम हसन साकीबच्या थ्रोवर दिव्यांश सक्सेना थोडक्यात बचावला. शाकिबने जाणीवपूर्वक सक्सेनाच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय भारतीय फलंदाज बाद झाल्यावर बांगलादेशचे गोलंदाजही घाणेरडे हावभाव करीत होते.
आपल्या संघातील खेळाडूंची वर्तणुकीवर बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने दिलगिरी व्यक्त केली आणि असे घडले की जे घडले ते दुर्दैवी होते. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बांगलादेशी कर्णधार अकबरने वयापेक्षा अधिक परिपक्वता दाखवताना, आमचे काही गोलंदाज मूडमध्ये होते आणि अधिक उत्साही झाले. सामन्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे. मी भारताचे अभिनंदन करू इच्छितो, असे सांगितले.