बारामतीमध्ये ‘मी पुन्हा येईन’, असे म्हणत आहे आमिर खान


पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख उपस्थित होते. यावेळी सगळ्यांचे लक्ष उपस्थित असलेला अमिर खानने वेधले. कृषिक या प्रदर्शनाचे यावेळी आमिर खानने तोंड भरून कौतूक केले. त्याचबरोबर हे मोठे काम एका दिवसात बघून होणार नसल्यामुळे आपण हे सगळे शिकायला ४ दिवस तरी बारामतीत येणार असल्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

सामाजिक क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा अभिनेता अमिर खान हा उमटवत असतो. तो सत्यमेव जयते, पाणी फाऊंडेशनच्या कामातून सतत सामाजिक बांधिलकी जपतो. आजपर्यंत अनेक गावांचा पाण्याचा मोठा पाणी फाऊंडशेनने प्रश्न सोडवला या विषयी बोलताना अमिर म्हणाला, महाराष्ट्रातील अनेक समस्या लक्षात घेता एका समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पाणी ही महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाची समस्या असल्याचे लक्षात आले आणि पाण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. खरतर हे काम शेतकऱ्यांचे आहे आम्ही फक्त मार्ग दाखवला. पाण्याबरोबरच कृषी क्षेत्रातही कशी प्रगती होईल याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे अमिर म्हणाला.

शिक्षणासाठीही गेल्या काही वर्षापासून काम करत आहोत. शिक्षणाविषयी, पर्यावरणाविषयी, कृषी क्षेत्राविषयी लहान मुलांमध्ये गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे आमिर खान शिक्षणाविषयी बोलताना म्हणाला. त्याचबरोबर या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे अमिरने खूप कौतूक केले. गेले काही वर्ष येथे येण्याची इच्छा होती, पण या निमित्ताने यायला मिळाल्याचे अमिर म्हणाला. त्याचप्रमाणे येथील हे मोठे कार्य एका दिवसात न शिकता आणखी ४ दिवस येथे येण्याची आणि शिकण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली.

Leave a Comment