जोपर्यंत शरद पवार निश्चित तोपर्यंत सरकार स्थिर – सामना


मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यातील सत्ता काबीज केली. तेच महाविकास आघाडीचे सरकार आपला ५ वर्षाचा कालावधी पूर्ण करेल. ८० तास ज्यांनी सरकार बनवले, त्यांना ८० दिवसही उद्धव ठाकरेंचे सरकार चालणार नाही, असे वाटत आहे. पण त्यांनी या भ्रमातून बाहेर यावे, ५ वर्षाचा कार्यकाळ महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण करेल, असा विश्वास शिवसेनेचे मुखपत्र सामनातून व्यक्त करण्यात आला आहे. शरद पवार जोपर्यंत निश्चित आहेत, तोपर्यंत सरकार स्थिर असल्याचेही सेनेने म्हटले आहे.

चांगला कारभार महाविकास आघाडीचे सरकार करेल. ५ वर्ष हे सरकार टिकण्यात शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका महत्वाची असल्याचे सेनेने म्हटले आहे. १७० सदस्यांचे बहुमत असलेले सरकार सध्या भक्कम असल्यामुळे ज्यांनी ८० तासांचे सरकार स्थापन केले त्यांनी या भ्रमात राहू नये असा टोलाही भाजपला सेनेने लगावला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यात भूमिका महत्वाची असल्याचे सेनेने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून अजित पवार यांनी बंड केले होते. भाजपशी हातमिळवणी करत त्यांनी ३ दिवस सत्ता स्थापन केली होती. अजित पवार यांच्यावरच भाजपच्या आशा आहेत. पण अजित पवारांची चिंता करु नका, तेच महाविकास आघाडीचे सरकार टिकवतील असा विश्वास खुद्द शरद पवार यांनीच दिल्याचे सेनेने म्हटले आहे.

नागपुरमध्ये उद्यापासून (१६ डिसंबर) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सेनेने म्हटले आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते म्हणत होते की, महाराष्ट्राने देशाला नवी दिशा दिली आहे. त्यामुळे जे महाराष्ट्रात झाले ते इतर राज्यातही घडेल असा विश्वास बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी व्यक्त केल्याचेही सेनेने म्हटले आहे.

आजही बुलेट ट्रेन कोणासाठी? याबाबत शंका कायम असल्याचे सेनेने म्हटले आहे. सर्व महागड्या प्रकल्पांपेक्षा मराठी माणसांच्या, शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटावेत अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे सेनेने म्हटले आहे. सातत्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना डावलले जात असल्यामुळे ते भाजपपासून तुटले असल्याचे सेनेने म्हटले आहे. ते भाजपमध्ये राहतील असे वातावरण सध्या तरी नाही.

Leave a Comment