शिवसेनेकडून आम्हाला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही – शरद पवार


नवी दिल्ली – आता दहा दिवसांपेक्षा जास्त काळ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हातात येऊन लोटला आहे. तरीही, अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. स्पष्ट बहुमत महायुतीकडे असूनही युतीचे सरकार सेना-भाजपमधील कलहामुळे स्थापन होत नसल्याचे चित्र असल्यामुळे सत्तेच्या वेगवेगळ्या पर्यायांची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पवार यांनी या चर्चेनंतर पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी आणि माझ्यात झालेल्या चर्चेबाबत जास्त काही सांगण्यासारखे नसल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. ते त्यानंतर बोलताना म्हणाले, की आम्ही मागील काही दिवसांपासून पाहत आहोत, सरकार स्थापन करण्यात शिवसेना आणि भाजप यशस्वी होत नाही. पण, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा एका पर्यायाची सत्तास्थापनेच्या पर्यायांमध्ये गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या विषयावर सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा झाली का? असे विचारले असता, पवार म्हणाले की शिवसेनेकडून अद्याप आम्हाला कोणताही प्रस्ताव न आल्यामुळे याबाबत आम्ही चर्चा करण्याचा प्रश्नच नाही. आपण पुन्हा एकदा सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती पाहता, पुढील वाटचालीसंदर्भात आपण ही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सत्तास्थापनेसाठी सध्या पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सत्तास्थापनेबाबत आम्ही विचार करत नाही. ज्यांना सत्तेचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला, त्या महायुतीकडे पुरेसे संख्याबळ आहे. पण, ते सत्ता स्थापन करत नाहीत. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता, त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापन करून आपले कर्तव्य पार पाडायला हवे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

यादरम्यान, पुन्हा एकदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का? असे एका पत्रकाराने विचारले असता, शरद पवारांनी त्यावर ‘नाही!’ असे एका शब्दात उत्तर दिल्यामुळे नक्कीच शरद पवार मुख्यमंत्री होतील यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Comment