जे लोक आवडीने मासे खातात त्यांना जर तुम्ही सांगितले की मासे खाणे टाळा, तर त्यांना ते शक्य होत नाही. पण या माश्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे आरोग्यास फायदेशीर असते. पण हे आरोग्यदायी ठरणारे मासे पावसाळ्यात मात्र आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. त्यामुळे मासे पावसाळ्यात खाणे टाळले तर योग्य ठरेल. अन्यथा जीभेची चव आरोग्यास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. डॉक्टरदेखील पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला देतात.
मासे आणि अन्य समुद्री जीवांसाठी हा काळ प्रजननाचा काळ असतो. अंडी असलेले मासे खाल्याने पोटात इंफेक्शन आणि फूड पॉयजनिंग होण्याचा धोका वाढतो. जल प्रदूषणाची संभावना पावसाळ्यात वाढते. माशांवर अशावेळी घाण जमा होते. तो थर पाण्याने धुतल्यानंतरही निघून जात नसल्यामुळे मासे खाल्याने टायफाईड, कावीळ आणि डायरिया यांसारखे आजार होऊ शकतात. मच्छीमारी पावसाळ्यात बंद असते. त्यामुळे ताजे मासे बाजारात मिळणे कठीण होते. बाजारात पॅक किंवा स्टोर केलेले मासे मिळतात. अधिक काळ मासे स्टोर केल्याने ते खराब होऊ शकतात. ते खाल्याने इंफेक्शनचा धोका वाढतो.