नवी दिल्ली – क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सध्या ६ पैकी ५ सामने जिंकून भारतीय संघ ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अद्याप एकही सामना भारतीय संघाने गमावलेला नाही. भारताचे पहिल्या फेरीतील एकूण ३ सामने शिल्लक आहेत. या ३ सामन्यांपैकी किमान १ सामना भारताने जिंकला तर भारताचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ पाकच्या संघाला सेमीफायनलापासून वंचित ठेवण्यासाठी काही सामने जाणूनबुजून हरू शकते, असा आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने केला आहे.
Basit Ali reckons India will not want Pakistan to qualify for the semi-finals and may play poorly in their matches against Sri Lanka and Bangladesh 🙄 #CWC19 pic.twitter.com/vwg3oFnnpl
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) June 26, 2019
बासित अली याला क्रिकेट जाणकार म्हणून पाकिस्तानच्या एका कार्यक्रमात बोलवण्यात आले होते. सूत्रसंचालकाने यावेळी त्याला विचारले की भारताचा संघ पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग रोखण्यासाठी मुद्दाम सामने पराभूत होईल का? बासित अली या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाला की पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाऊ नये म्हणून भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरोधात होणार सामना पराभूत होईल. ऑस्ट्रेलियादेखील मुद्दाम भारताविरुद्ध सामना हरला. त्याचबरोबर १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ जाणूनबुजून पाकिस्तान विरोधात पराभूत झाला होता. कारण त्यांना सेमीफायनलचा सामना त्यांच्या भूमीत खेळायचा होता, असा आरोप बासित अली याने केला.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अद्यापही अपराजित आहे. सेमीफायनलमधील भारताचे स्थान जवळपास निश्वित आहे. भारताचे श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांच्याविरोधात सामने होणार आहेत. याउलट सध्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ ‘करो या मरो’ स्थितीत आहे. पण पाकने भारताकडून पराभव झाल्यानंतर चांगले कमबॅक केले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. पाठोपाठ अपराजित असलेल्या न्यूझीलंडविरोधातही त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्पर्धत आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत.