राजकारण आणि देशांच्या सीमेपासून कलेला वेगळे ठेवायला हवे – विद्या बालन

vidya-balan
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करण्यास हिंदी चित्रपटसृष्टीने मज्जाव केला आहे. त्याचबरोबर यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना काम न देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. आता याबाबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील आपले मत व्यक्त केले आहे. यावर बोलताना विद्या म्हणाली, की राजकारण आणि देशांच्या सीमेपासून कलेला वेगळे ठेवायला हवे या मताची मी असून सध्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसत असल्यामुळे त्याविरोधात कठोर पावले उचलली गेली पाहिजेत.

सीआरपीएफचे ४९ जवान पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. देशातील जनता वीरमरण पावलेल्या या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठाम राहिली आहे. विद्या बालनला कला ही राजकारणापासून वेगळी असायला हवी का असे विचारले असता ती म्हणाली, मला वैयक्तिक पातळीवर असे वाटते की माणसे जोडण्यासाठी कले सारखा दूसरा चांगला मार्ग नाही. मग ते संगीत, कविता, नृत्य, नाटक, चित्रपट किंवा कोणताही कलेचा प्रकार असो. पण सध्याची परिस्थिती बघता यावर पुन्हा एकदा विचार व्हायला हवा. गरज पडली तर काही कठोर निर्णय घेण्याची गरजही विद्या बालननी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment