…तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही – पंकजा मुंडे

pankaja-munde
नांदेड : राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर वचन धनगर समाजाला दिले आहे. सध्या नांडेद जिल्ह्यातील माळेगाव येथे खंडोबाची यात्रा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य यावेळी आयोजीत धनगर आरक्षण जागर परिषदेत केले आहे.

रासप पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांची देखील या परिषदेला उपस्थिती होती. मी पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला वचन देते, तुमच्या आरक्षणाचा विषय होईपर्यंत मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. आम्ही पुन्हा सत्ता काबीज करणार आहोत, पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकत नाही याचा विश्वास असल्याचे म्हणत धनगर आरक्षणाच्या निर्णयाशिवाय पुन्हा भाजपची सत्ता येणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कबुल केले.

दिल्लीच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेर येऊन धनगर आरक्षणासाठी तुमच्यासोबत मेंढरांमागे येण्याची तयारी असल्याचा विश्वासही पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिला. मराठा आरक्षण दिल्यानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत धनगर आरक्षणाचा मुद्दादेखील मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती.

धनगर आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आल्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षण देण्यासाठी सरकार दरबारी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही.

Leave a Comment