दिल्ली – अल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात मान्सूनचा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे नवीन सरकारने आपत्कालीन योजना तयार केली आहे. जीवनावश्यक असलेल्या गहू, तांदूळ, साखर, कांदा, बटाटा व डाळींवर निर्यात बंदी घातली जाईल असेही सांगितले जात आहे. दुष्काळ पडल्यास शेतकर्यांचे नुकसान होऊ नये तसेच देशातील जनतेला अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि महागाईही नियंत्रणात रहावी यासाठी कांही निर्णय घेण्यात आले असल्याचे समजते.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर शेतकर्यांना डिझेलवर सबसिडी दिली जाणार आहे. तसेच बी बियाणांवरील सबसिडी वाढविली जाणार आहे. कर्जमाफीची योजनाही तयार करण्यात आली असून दुष्काळग्रस्त राज्यांना विशेष मदत पुरविली जाणार आहे असे समजते. खरीप पिकांची पाहणी करून त्यांचे मूल्य अगोदरच निश्चित करण्याच्या सूचना दिल्या गेल्या असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडून सांगितले जात आहे.