गोची कोणाची झाली ?

    भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेले बंड क्रमांक दोन थंड होत आले आहे. या संबंधात समजूतदार पणा न दाखवता ते फारच हट्टाला पेटले तर पक्षश्रेष्ठी त्यांचा प्रत्येक हट्ट मान्य करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षाच्या बाहेर पडावे लागेल. मात्र आपली गोची झाली आहे तेव्हा आपण शांतपणे नमते घेतले पाहिजे हे त्यांना उमगले तर ते पुन्हा पक्षातच मानाने राहू शकतील. यातले नेमके काय होणार हे आता एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. अर्थात पक्षाने हे बंड कितीही कठोरपणे हाताळायचे ठरवले असले तरीही तेवढा  कठोरपणा आपल्याला परवडणारा नाही याची जाणीव श्रेष्ठींनाही आहे. तेव्हा श्रेष्ठीही मडे यांच्या प्रकरणात द्विधा मनस्थितीत आहेत. दोघांचीही कोंडी झाली आहे. 

पक्षाला धक्का न बसता मुंडे यांना आता आपले फार लाड होणार नाहीत असे बजावण्याची तारेवरची शब्दांची कसरत पक्षाला करावी लागत आहे. तर मुंडे यांना आता समोर कोणतेच समर्थ पर्याय नसल्यामुळे पक्षात राहण्याची घोषणा करावी लागणार आहे पण अशी गुडघे टेकण्याची भूमिका घेतानाही आपला पक्षातला मान कायम आहे असे चित्र त्यांना निर्माण करावे लागत आहे. पक्ष आणि मुंडे यांची अशी कोंडी झाली असून तिच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रेष्ठींनी मुंडे यांना  व्यथा, वेदना सांगण्यासाठी पाचारण केलेले होते. अशा बैठकीमध्ये मुंडे पक्षश्रेष्ठींना निरुत्तर करतील आणि आपल्यावर कसा अन्याय होत आहे याचा पाढा वाचतील तेव्हा पक्षश्रेष्ठींना बचावाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे कालपर्यंत समजले जात होते. परंतु श्रेष्ठींची मनस्थिती बदलली आहे आणि भोवतालची स्थितीही बदलली आहे.

मुंडे यांनी महाराष्ट्रतल्या आपल्या कथित जनाधाराचा नको एवढा भरवसा बाळगून आणि चुकीच्या सल्लागारांच्या सल्ल्याने बंड केले होते.  या बंडामागे काही व्यथा आणि वेदना आहेत. असे मुंडे यांचे म्हणणे आहे. गोपीनाथ मुंडे  पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या वेदना  सांगतील पण त्या किती   किरकोळ आहेत हे त्यांच्याच लक्षात आले आहे. ज्या काही किरकोळ वेदना असतील त्या वेदना त्यांच्या अहंमन्य स्वभावातून निर्माण झालेल्या आहेत हेही त्यांच्याबरोबरच पक्षश्रेष्ठींच्याही ध्यानात आले आहे. संवाद कौशल्यामध्ये एक धडा दिला जातो. त्यामध्ये विचार करून बोला, असे सांगितले जाते. खरे म्हणजे हे सांगण्याची काही गरज नाही. परंतु सर्वसाधारणपणे लोक विचार न करता बोलतात आणि बोलल्यानंतर त्यांच्यावर विचार करण्याची पाळी येते. कारण ते अविचाराने बोललेले असतात आणि बोलण्याचे परिणाम दिसायला लागताच आता यातून बाहेर कसे पडावे यासाठी त्यांना नंतर विचार करत बसावे लागते. गोपीनाथ मुंडे यांच्यावर आता अशी पाळी आलेली आहे. आपण पक्षात नाराज आहोत, असे त्यांनी जाहीर करून टाकले आणि अनेक नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. त्यातून मुंडे आता पक्षाच्या बाहेर पडणार, या चर्चेला वेग आला. आता मुंडे थोडेसे सावध झाले आहेत आणि आपण पक्षातून बाहेर पडणार नाही, असे म्हणायला लागले आहेत. एवढे करून ते थांबलेले नाहीत तर त्यांनी आपण पक्षातून बाहेर पडणार असा प्रचार आपल्याच पक्षाचे लोक करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला आहे. थोडा बारकाईने विचार केला तर यामध्ये त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा काही दोष नाही, असेल तर त्यांचा स्वतःचाच दोष आहे. कारण त्यांनी माध्यमांसमोर आपण नाराज आहोत, असे जाहीर करून टाकले आणि नंतर भुजबळ तसेच उद्धव ठाकरे  यांची भेट घेतली. त्याशिवाय आपल्या समर्थक आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या. अशा वेळी ते इतर पक्षात जाण्याच्या विचारात आहेत असा अर्थ कोणी काढला तर त्यात चूक काय? तेव्हा मुंडेंच्या इतर पक्षात जाण्याची चर्चा मुंडेंनीच सुरू करून दिलेली आहे. यात काही शंका नाही. परंतु आता मात्र त्यांच्यावर नमते घेण्याची वेळ आली आहे. कारण त्यांच्यासाठी अन्य पक्षाची कवाडे बंद आहेत. 

काँग्रेसचा दरवाजा त्यांच्यासाठी खुला होऊ शकतो, परंतु ते काँग्रेसमध्ये गेले तर त्यांचा नारायण राणे होऊन जाईल हे पक्के आहे. तरी सुद्धा ते काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना नंतर यापेक्षा भाजपमध्ये बरा होतो, असा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. हे त्यांनाही चांगले कळते. शिवसेनेचा एक पर्याय होता. परंतु नितीन गडकरी यांनी, शिवसेनेने मुंडेंना आत घेतल्यास भाजपा-शिवसेना युती मोडेल, असा स्पष्ट इशारा दिला. त्यामुळे शिवसेना नेते हादरले आणि आपोआपच मुंडे यांच्यासाठी शिवसेनेचाही दरवाजा बंद झाला. राहता राहता राष्ट*वादी काँग्रेस. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे सख्य सगळ्या महाराष्ट*ाला माहीत आहे. तेव्हा आपला असा कट्टर शत्रू शरद पवार आपल्या पक्षात घेतील असे संभवत नव्हतेच. मुंडे यांचे बंड थंड होत असतानाच्या ऐन मोक्यावरच शरद पवार यांनी, मुंडे यांच्यासाठी राष्ट*वादीत जागा नाही असा टोला लगावून मुंडे यांचा तिसरा पर्यायही बंद करून टाकला. मुंडे अडचणीत आले आहेत म्हणून त्यांना पूर्ण नमवून पक्षात ठेवणेही चांगले नाही कारण भाजपात आज असा नेता नाही. पक्षाच्याही काही मर्यादा आहेत. त्यांचीही पक्षाला जाणीव ठेवावी लागत आहे.

Leave a Comment