न्या. कोळसे-पाटील लोकसभेच्या रिंगणात

अहमदनगर – नगर मतदारसंघातून लोकशासन पक्षाने अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी गुरुवारी घोषित केली. नगरच्या मतदारांनी निवडून दिले तर या मतदारसंघाचे नंदनवन करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. ‘राजकारणात खोटे कसे बोलायचे हे पवारांनी शिकविले. केंद्रात शेतकऱ्यांच्या धोरणांना विरोध करायचा व महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नेते म्हणून मिरवायचे, ही त्यांची सवय आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे उत्तम काम ते करतात,’ अशा शब्दात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली.  लोकशासन पक्षाच्यावतीने येथील ओम गार्डनमध्ये समर्थकांचा मेळावा झाला. 

पक्ष स्थापनेनंतर काही दिवसांपूर्वी नगरला झालेल्या मेळाव्यात पक्षाच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार मेळावा घेऊन कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा पक्षाने केली. यावेळी बोलताना कोळसे यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. ‘सरकार फक्त कल्याणकारी योजनांची घोषणा करते मात्र त्या प्रत्यक्षात राबवत नाही. काँग्रेस व भाजप हे वेगवेगळे पक्ष नाहीत. त्यामध्ये एकमेकांच्या नातेवाइकांची गुंफण आहे. हे पक्ष सर्वसामान्य जनतेला विचारत नाहीत, ते भांडवलशाहीला महत्व देतात. मुलगा, भाऊ, काका, पुतण्या यांच्याभोवतीच या पक्षांचे राजकारण फिरत आहे. सामान्यांच्या प्रश्नांवर २५ वर्षे आंदोलन करूनही सरकारला जाग येत नाही. यामुळे आमच्या पक्षाने निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे,’ असे सांगून ते म्हणाले, ‘उमेदवारीच्या माध्यमातून मी घराघरात जाणार असून प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे. एक पैसाही कोणाकडून घेणार नाही व खर्चही करणार नाही. 

सभांचे आयोजन मी करणार नसून सर्वसामान्यांनी निवडणूक हातात घ्यायची आहे. मतदारांनी जर मला संधी दिली तर मी नगर मतदारसंघाचे नंदनवन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असेही यांनी स्पष्ट केले.  लोकशासन पक्षाचा मेळावा सुरू असताना कोळसे यांच्या प्रचारासाठी कारभारी गवळी यांनी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र कोळसे यांनी ती नाकारली. तरीही नंतर जिल्ह्यातील कष्टकरी महिलांनी स्वतःच्या एक दिवसाच्या रोजगाराची रक्कम कोळसे यांच्या प्रचारासाठी जाहीर केली.