मुख्यमंत्री उद्या साधणार राज्यातील जनतेशी संवाद ?


मुंबईः राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्तावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध आवश्यक आहेत. आज यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पुन्हा कडक लॉकडाऊनबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तसे संकेतही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावाला लागेल, अशी माहिती दिली आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांना बेड मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल लवकरच त्यासंबंधी गाइडलाइन जारी करण्यात येतील, असे अस्लम शेख यांनी म्हटल्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.

बुधवारी रात्री आठपासून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता मुख्यमंत्री लॉकडाऊनसंदर्भातील शेवटचा निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्या रात्री आठनंतर लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

१५ दिवसांचा राज्यातील हा लॉकडाऊन असेल. तसेच, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत. पण, जिल्हाबंदी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही तासांतच कठोर लॉकडाऊनच्या गाइडलाइन जारी करण्यात येतील अशी माहिती समोर येत आहे. तसेच, मुंबई लोकलबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्या जाहीर करणार असल्याचे वृत्त आहे.