राज्याला उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुरवठा करण्यात आला : देवेंद्र फडणवीस


मुंबई : एनआयएच्या अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे पत्र हे अत्यंत गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन सत्य काय ते बाहेर आले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर लसींसंदर्भातील राजकारण सरकारने थांबवले पाहिजे, असे मत देखील व्यक्त केले आहे. सचिन वाझे यांचे पत्र आणि राज्यांत सध्या निर्माण झालेला लसींचा तुटवडा या प्रकरणांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सचिन वाझे यांचे पत्र अत्यंत गंभीर, तसेच त्यामधील मजकूरही आपल्या सर्वांना विचार करायला लावणार आहे. एकूणच महाराष्ट्रात जे घडत आहे किंवा ज्या गोष्टी बाहेर येत आहेत, त्या महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चांगल्या नाहीत. तसेच पोलिसांच्या प्रतिमेसाठीही चांगल्या नाहीत. आज यावर मी एवढेच म्हणेल जे पत्र समोर आले आहे, त्यासंदर्भात आधीच माननीय उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्यास सांगितले आहे.

तसेच याप्रकरणी जे काही समोर येत आहे, त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी किंवा जी यंत्रणा करत असेल त्यांनी करावी. अशा प्रकारचे पत्र समोर आल्यानंतर त्याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे. ते पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणी जे काही जबाब नोंदवण्यात येत आहेत. याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आले पाहिजे. मुळात या सर्व प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचे काही असेल तर ते सत्य बाहेर येणे. सत्य जर लवकर बाहेर आले नाही, तर पोलिसांची ही जी प्रतिमा डागाळत आहे, ती कधीच ठिक होऊ शकणार नाही.

रेडमीसिवीरच्या संदर्भात सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपण मागच्याही वेळी पाहिले की, रेडमीसिवीरच्या काळा बाजार काही लोक करत होते. हिच परिस्थिती आपल्याला आताही पाहायला मिळत आहे. मुळातच आताची कोरोनाची दुसरी लाट आहे, ती देशातील सर्व राज्यांमध्ये नाही, तर ती काहीच राज्यांमध्ये आहे. मागची लाट ही सगळ्या राज्यांमध्ये होती. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये लाट नाही, त्या ठिकाणाहून आपल्याला रेडमीसिवीर घेता येईल का? याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

काल आपल्या सर्वांपर्यंत केंद्रीय आरोग्यमंत्र्याचे पत्र पोहोचले आहे. लसीचे राजकारण महाराष्ट्र सरकारने बंद केले पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केले पाहिजे. महाराष्ट्राला झालेल्या लसींच्या पुरवठ्यासंबंधीची आकडेवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. टीका करणाऱ्यांनी हे पाहिले पाहिजे की, महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुरवठा राज्याला करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.