शेतकरी आंदोलनामुळे अर्थव्यवस्थेला धोका: सीआयआय


नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे अडचणीत आलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्याच्या प्रयत्नात असताना शेतकऱ्यांच्या लांबत चाललेल्या आंदोलनामुळे ती पुन्हा धोक्यात येऊ शकते असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने दिला आहे.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात ३२ शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलकांनी २० दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडले आहे  सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. सरकारने कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

शेतकरी आंदोलनामुळे अन्न धान्य व इतर शेतमालाच्या वितरणाची साखळी खंडीत होण्याची भीती आहे. आंदोलन दीर्घकाळ सुरु राहिल्यास वितरण व्यवस्था ठप्प होऊन भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. कोरोना महासाथ आणि त्यामुळे लागू करावा लागलेला लॉक डाऊन यामुळे जगभरातील सर्व अर्थव्यवस्था अडचणीत आल्या असून भारतीय अर्थव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. या संकटातून सावरू पाहत असतानाच शेतकरी आंदोलन अधिक काळ लांबल्यास त्याला धोका वाढू शकतो, असा इशारा ‘सीआयआय’ने दिला आहे.