मुंबई – बीड अॅसिड हल्ल्याच्या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करताना भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे? असा प्रश्न विचारत टीका केली आहे. आता कुठे गेले हाथरसवरुन राजकारण करणारे लोक, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. राज्यातील महिलांवर सातत्याने अत्याचार होत असताना राज्य सरकार कोणतेही पावले उचलताना दिसत नाही. राज्य हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले असल्याची टीकाही निलेश राणे यांनी केली आहे.
बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 15, 2020
या प्रकरणी केलेल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
पुण्याहून दिवाळीसाठी गावी परतणाऱ्या तरुणीवर अॅसिड फेकून पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. जिल्हा रुग्णालयात गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. तरुणीवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.