मुंबई – केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी उद्यापासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी असल्याची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. सर्व महिलांना उद्यापासून सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱण्याची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार त्वरित परवानगी देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिले होते. राज्य सरकारने घटस्थापनेच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी लोकल प्रवासाला सरसकट सगळ्या महिलांना परवानगी देण्याची मागणी केली होती. पण यासंदर्भातील परवानगी रेल्वे बोर्डाने नाकारली होती.
मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020
मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचा पेच सुटला, असे वाटत असतानाच परिस्थिती जैसे थेच राहिली. अशात आता पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला राज्य सरकारने विनंती करणारे पत्र आज पाठवले होते. रेल्वेमंत्र्यांनी त्याची मात्र दखल घेतल्याचे दिसत असून राज्य सरकारने महिलांनी मागणी केल्याप्रमाणे लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे.