
बोफोर्सच्या प्रकरणात तीन व्यक्ती प्रामुख्याने अडकलेल्या होत्या. राजीव गांधी, क्वॉत्रोची आणि बोफोर्स कंपनीचा वकील आर्बदो. यातला क्वात्रोची हयात आहे. राजीव गांधी गेले. पण जाताना बोफोर्सचे रहस्य उघड न करताच गेले.

बोफोर्सच्या प्रकरणात तीन व्यक्ती प्रामुख्याने अडकलेल्या होत्या. राजीव गांधी, क्वॉत्रोची आणि बोफोर्स कंपनीचा वकील आर्बदो. यातला क्वात्रोची हयात आहे. राजीव गांधी गेले. पण जाताना बोफोर्सचे रहस्य उघड न करताच गेले.
आर्बदो मरण्यापूर्वी म्हणाला होता की, बोफोर्सचे रहस्य काय आहे ते मलाच माहीत आहे आणि ते माझ्या पोटात आहे. हे रहस्य माझ्यानंतर माझ्या सोबत गाडले जाणार आहे. तो गेला आणि त्याने म्हटल्या प्रमाणे ते रहस्य गाडले गेले आहे. आता आर्बदो काहीही म्हणो पण अशी गुपिते गाडली जातात तेव्हा ती भूत होऊन राहतात. भूत ही काही सामान्य बाब नाही. ते मानगुटीवर बसलेले असते. पुन्हा पुन्हा जागे होते.
मात्र साधारणत: १२ वर्षांनी ते मुक्त होते. बोफोर्सचे भूत भलतेच भारी दिसते आहे. २५ वर्षे झाली तरी ते मुक्त व्हायला तयार नाही. १९८७ सालपासून या प्रकरणाने कॉंग्रेसचा पिच्छा पुरवलेला आहे. त्या सगळया प्रकरणाची कहाणी मोठीच रंजक आहे. त्याची भारतात तर चौकशी झालीच पण स्विडनमध्येही चौकशी झाली. ती चौकशी करणार्या पोलीस अधिकार्याने आता या संबंधात तोंड उघडले आहे. बोफोर्स तोफांच्या व्यवहारामध्ये लाच घेतली गेली आणि ती कोणी घेतली हे माहीत असून सुद्धा राजीव गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे या वकिलाने म्हटले आहे.
या प्रकरणात अमिताभ बच्चन आणि गांधी कुटुंबात बराच घरोबा असल्यामुळे त्यांना या प्रकरणात ओढले गेले. मात्र, आता या स्वीडिश अधिकार्याने अमिताभ बच्चन या प्रकरणात दोषी नव्हते, असा निर्वाळा दिला. म्हणजे अमिताभ बच्चन निर्दोष, राजीव गांधी यांचा कानाडोळा आणि ऑटोविओ क्वॉत्रोची याने घेतलेली लाच, अशा तीन गोष्टी यातून उघड झाल्या आहेत.
वास्तविक, या अधिकार्याने फार काही नवीन सांगितलेले नाही. सुमारे दोन तपाच्या चर्वित चर्वणानंतर आणि एकंदरीत झालेल्या तपासानंतर याच गोष्टी उघड झालेल्या होत्या. परंतु आता हीच गोष्ट एका अधिकृत व्यक्तीने सांगितली त्यामुळे खळबळ माजली. त्याशिवाय भारतातल्या लोकांनाही बोफोर्सची कसली का होईना, पण चर्चा उपस्थित झाल्याशिवाय करमत नाही. आता या अधिकार्याने चर्चेला खाद्य पुरवले. आजपर्यंतच्या सार्या तपासांनी राजीव गांधींनी लाच घेतली असे कधीच म्हटलेले नाही. परंतु सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी घरोब्याचे संबंध असलेल्या इटालियन व्यापारी क्वात्रोची यांनी मात्र लाच घेतली आहे.
आता ही गोष्ट केंद्र सरकारच्या आयकर खात्याने सुद्धा उघड केलेली आहे. कारण या खात्याला क्वात्रोचीने खाल्लेला पैसा कोणत्या बँकेच्या कोणत्या नंबरच्या खात्यावर जमा केलेला आहे हे सुद्धा कळलेले आहे आणि तसे आयकर खात्याने जाहीरही केलेले आहे. त्यामुळे राजीव गांधींवरचा जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप जवळपास सिद्धच झालेला आहे. त्यामुळे आता झालेला गौप्यस्फोट तसा कॉंग्रेसला अडचणीचाच ठरणार आहे.
बोफोर्सच्या प्रकरणात दोन गोष्टी वारंवार परंतु दिशाभूल करणार्या सांगितल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे बोफोर्स तोफांनी कारगीलच्या युद्धामध्ये उत्तम कामगिरी बजावली. त्यामुळे विरोधकांचे आरोप खोटे ठरले आहेत. खरे म्हणजे विरोधी पक्षांनी बोफोर्स तोफांच्या दर्जाविषयी किंवा त्यांच्या कार्यक्षमतेविषयी कधीच शंका व्यक्त केलेली नव्हती. बोफोर्स तोफा वाईट आहेत, कुचकामी आहेत असे कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याने कधीही चुकून सुद्धा म्हटलेले नव्हते.
बोफोर्स तोफांची कार्यक्षमता हा विषयच नव्हता. विषय होता तो दलालीचा. या तोफा खरेदी करताना कोणीही दलाली घेऊ नये, असा संरक्षण खात्याचा आदेश असताना सुद्धा सोनिया गांधी यांचे निकवटर्तीय असलेल्या क्वात्रोचीने या प्रकरणात दलाली घेतली. ती कशी घेतली, हा विषय वादाचा आहे. तेव्हा बोफोर्स तोफांनी मोठा पराक्रम गाजवला यामध्ये विरोधी पक्षांच्या आरोपातील फोलपणा सिद्ध होण्याचा काही प्रश्नच येत नाही.
दुसरा एक दिशाभूल करणारा मुद्दा आहे तो वाजपेयी सरकारविषयीचा. भारतीय जनता पार्टीने बोफोर्सचा विषय लावून धरला. पण स्वत:चे सरकार केंद्रात आले तेव्हा या विषयात काहीच तपास केला नाही, असेही दिशाभूल करणारे विधान केले जाते. वस्तुस्थिती अशी आहे की, वाजपेयी सरकारने या प्रकरणाचा तपास केला आणि न्यायालयात खटला सुद्धा दाखल केला. दिल्ली उच्च न्यायालयाने राहुल गांधींनी लाच घेतली नाही, असा निर्णय दिला. हा निर्णय २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात लागला.
त्यानंतर मनमोहनसिंग सरकार सत्तेवर आले. या सरकारने या निकालाचा पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयात अर्ज करायला हवा होता, परंतु तो केला नाही. कारण या सरकारच्या कर्त्यासवरत्या सोनिया गांधी याच आहेत. तेव्हा वाजपेयींनी चौकशी केली नाही, या म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यांनी चौकशी केलीच, पण मनमोहनसिंग सरकारने ती चौकशी थांबवली. या प्रकरणातले सत्य कॉंग्रेसच्या नेत्यांनाही माहीत आहे म्हणून ते या प्रकरणावर सातत्याने पांघरूण घालत असतात.