
मुंबई : देशासह राज्यावर ओढावलेले संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. त्यातच राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात राज्यात 5 हजार 493 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात 5318 तर परवा 5024 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचली आहे. यापैकी 86 हजार 575 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 70 हजार 607 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकट्या मुंबईत काल 1287 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात 867 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 64 हजार 626 वर; काल 5493 नव्या रुग्णांची नोंद
यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे काल दिवसभरात 2 हजार 330 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.59 टक्के एवढे आहे. तर काल दिवसभरात 156 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 60 मृत्यू मागील 48 तासातील आहेत, तर उर्वरित 96 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील 64, ठाणे 24, जळगाव 6, जालना 1 आणि अमरावतीमधील एका मृत्यूचा समावेश आहे.
राज्यात आत्तापर्यंत 9 लाख 23 हजार 502 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 1 लाख 64 हजार 626 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.17.82 टक्के एवढे प्रमाण आहे. राज्यात सध्या 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात सध्या 5 लाख 70 हजार 475 लोक होम क्वॉरंटाइनमध्ये आहेत. तर 37 हजार 350 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
