
नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये कहर करत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारताची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 हजारांच्या पार पोहचला असून 2 हजार 109 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकवण्यासाठी देशभरातील सर्वच संस्था एकवटवल्या आहेत. यातच सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलच्या सहकार्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (IIT) गुवाहाटी यांनी विविध राज्यांमध्ये येत्या 30 दिवसांत कोरोना संसर्गाच्या घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. यानुसार आगामी 30 दिवसांत देशात 5.5 लाख कोरोनाची प्रकरणे समोर येतील, असा अंदाज वर्तवला आहे.
सिंगापूरमधील संस्था आणि आयआयटी गुवाहाटीचा अंदाज; आगामी 30 दिवस भारतासाठी धोक्याचे
देशात संक्रमणाचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्या तीनही मॉडेल्सच्या मदतीने हे नवीन मॉडेल तयार करण्यात आले असून या मॉडेल अंतर्गत राज्ये तीन विभागांमध्ये विभागली गेली आहेत. विद्यमान रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनपेक्षा वेगळे हे वर्गीकरण आहे. संशोधकांच्या पथकाने सांगितले की सध्या लॉजिस्टिक पद्धतीने 30 दिवसांत 1.5 लाख आणि घातांकीय (एक्सपोनेंशिअल) पद्धतीने 5.5 लाख प्रकरणे आढळतील अशी शक्यता वर्तवली आहे. आयआयटी गुवाहाटीचे सहाय्यक प्राध्यापक पलाश घोष म्हणाले की, कोणत्याही एका मॉडेलने केलेला अंदाज योग्य होणार नाही. हे लक्षात घेऊन आम्ही तिन्ही मॉडेल्स एकाच वेळी वापरली आहेत. यासह, मॉडेल विनामूल्य दररोज संसर्ग दर देखील वापरला गेला आहे.
