एपीएमसी मार्केट ११ ते १७ मे पर्यंत पूर्णपणे बंद


मुंबई – मुंबईसह उपनगरातील कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी लक्षात घेता नवी मुंबईमधील एपीएमसीची पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सोमवारपासून एका आठवड्यासाठी म्हणजे ११ ते १७ मे पर्यंत अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार असल्याचा हा निर्णय कोकण आयुक्त, पोलीस, माथाडी नेते यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान मार्केट बंद असणाऱ्या वेळेत व्यापारी, कामगारांची तपासणी केली जाणार आहे.

गेल्या दहा दिवसांत नवी मुंबईत तीनशे कोरोनाग्रस्त वाढले असून यात एपीएमसी बाजार आवारातील संसर्गाचे ७९ रुग्ण झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. येथून नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील रुग्ण वाढीबरोबर आता इतर जिल्ह्य़ातही संसर्ग पोहचत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा संसर्ग वेंगुर्ले येथील हापूस वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला झाल्यामुळे एपीएमसी बंदची मागणी होत होती. त्याचबरोबर सोशल मीडियावर क्लोज एपीएमसी, सेव्ह नवी मुंबई अशी मोहीम सुरू झाल्यानंतर मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

एपीएमसीत गेल्या दोन आठवडय़ांत कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. नवी मुंबईतील रुग्णसंख्या येथील रुग्णांमुळे झपाटय़ाने वाढली आहे. नवी मुंबईत गेल्या दहा दिवसांत तीनशे जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी एपीएमसीतील फळ बाजारात वेंगुर्ले येथील आंब्याचा ट्रक घेऊन आलेल्या एका चालकाचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांनी आता तेथून ही वाहतूक बंद केल्याची माहिती फळ व्यापाऱ्यांनी दिली.

Leave a Comment