राज्यात कलम 188 अंतर्गत आतापर्यंत 91 हजार 217 गुन्हे दाखल!


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते दोन मे या कालावधीत कलम 188 नुसार राज्यात 91 हजार 217 गुन्हे दाखल झाले आहेत. 18 हजार 48 व्यक्तींना या दरम्यान अटक करण्यात आली आहे. तर तीन कोटी 25 लाख (3 कोटी 25 लाख) रुपयांचा दंड या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी आकारण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान, घरगुती अत्याचारामध्ये या लॉकडाऊनच्या काळात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्याचे गृहमंत्री यांनी यापूर्वीच घरगुती अत्याचारावरुन नागरिकांना इशारा दिला होता.

राज्यातील कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्यापासून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू होईल. राज्यात या लॉकडाऊनच्या काळात 188 कलम लावण्यात आले आहे. राज्यभरातील पोलीस विभागाच्या 100 या हेल्पलाईनवर 82,294 फोन आले, योग्य ती दखल त्या सर्वांची घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा 630 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवल्याची माहिती दिली आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार 255 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, 51 हजार 719 वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत.

Leave a Comment