
मुंबई : एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत आहे, तर दुसरीकडे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भुराट्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये दुपट्टीने वाढ झाल्याचे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या संशोधनातून समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे सध्या संपूर्ण जग केवळ इंटरनेटवर अवलंबून आहे. त्यातच अनेक कंपन्या बंद असल्यामुळे जगभरातील बहुतांश लोक सध्याच्या घडीला वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देत असल्यामुळे बड्या कंपन्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत कोणीही सायबर गुन्हेगारीचा शिकार होण्याची शक्यता वाढली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ
कोरोना थीमवर आधारित सायबर हल्ल्यांमध्ये जानेवारीपासून वाढ झाली आहे. देशात गेल्या चार महिन्यात 12 लाख कोरोनासंबंधित हाय रिक्स डोमेन्स तयार झाले. तर जवळपास 16 लाख घोटाळ्यांची नोंद झाली आहे. बँका, वित्तीय संस्था, आरोग्य सेवा कंपन्या, सरकारी संस्थांना याचा धोका अधिक असून जागतिक आरोग्य संघटनेसारख्या आंतराष्ट्रीय संस्थेवरही मागील महिन्याभरात दुप्पट सायबर हल्ले झाल्याची बाब समोर आलेली आहे.
हॅकर्सच्या रडारावर मायक्रोसॉफ्ट क्लाउड टूल्स, स्काईप, झूम, इमेल्स, ऑनलाइन व्यवहार आहेत. त्यातच सायबर गुन्ह्यांचा सर्वाधिक फटका लघू व मध्यम उद्योगांना बसताना दिसत आहे. विविध अमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक केली जाते. अँटी व्हायरस, अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर आणि सुरक्षित व्हीपीएन नसल्यास सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक होण्याचा संभाव्य धोका वाढतो, अशी माहिती समोर आली आहे.
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर काय बरोबर नको ते मेसेज व्हायरल करणाऱ्यांनीची जणू फौजच तयार झाली. देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला, तर त्यानंतर पुन्हा 3 मे पर्यंत दुसरा लॉकडाऊन घोषित केला आहे.
