
मुंबई – कोरोनाशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकारसोबत राज्य सरकारच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला असून टाटा ट्रस्टने यामध्ये आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ट्रस्टने ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत. बजाज ग्रुपने यापूर्वी १०० कोटी रुपयांची मदत कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला देऊ केली होती.
कोरोना विरोधातील लढाईत टाटा ट्रस्टकडून आजवरची सर्वात मोठी मदत
कोरोनाचे संकट हे मानवजातीसमोरील अत्यंत कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी यापूर्वी देशाच्या गरजा भागवल्या आहेत. सध्याचे संकट हे मानवी शर्यतीतील भेडसावणार्या कठीण आव्हानांपैकी एक असल्याचे रतन टाटा यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. दरम्यान, सर्व बाधित रुग्णांचे संरक्षण आणि सबलीकरण करण्याची ग्वाही टाटा ट्रस्टने दिली आहे. त्यांनी त्यासाठी ५०० कोटी रुपये देण्याचे वचनही दिले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, त्यासाठी याचा वापर करण्यात यावा, असे टाटा ट्रस्टने म्हटले आहे.
