
मुंबई – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत राज्यात भाजप नव्हे तर शिवसेना सरकार स्थापन करणार असा दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार भाजपने फोडले तर आम्ही पोटनिवडणुकीत पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी आता केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
भाजप नव्हे तर, शिवसेना स्थापन करणार सरकार – जयंत पाटील
विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला लागला, या निकालात भाजपचे १०५, शिवसेनेचे ५६, काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले. भाजपला आता सत्तेपासून दूर ठेवायचे असेल आणि १४५ ची मॅजिक फिगर गाठायची असेल तर शिवसेनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकतात. जयंत पाटील यांनी याच सगळ्याबाबत प्रतिक्रिया देताना राज्यात भाजपचे नाही तर शिवसेनेचे सरकार येईल असे म्हटले आहे. रविवारी जी पत्रकार परिषद शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी घेतली त्यात त्यांनी आम्ही १७० चा आकडा बहुमत सिद्ध करण्यासाठी गाठू शकतो, असे म्हटले होते. या सगळ्याबाबत आता भाजप काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
