
ओडिशा राज्यातील खेत्रमोहन मिश्रा पंच्याहत्तर वर्षे वयाचे असून, दशरथपूर प्रखंडामधील मुरारीपूर गावाचे नागरिक आहेत. व्यवसायाने पत्रकार असलेल्या खेत्रामोहन यांनी आपल्यानंतर आपली जमीन राज्य सरकारच्या नावे करून देण्याचा निर्णय घेतला असून, या जमिनीचा उपयोग असहाय आणि गरजू वृद्धांसाठी वृद्धाश्रम उभारला जाण्याच्या कामी केला जाण्याची विनंतीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. असहाय आणि गरजू वृद्धांना आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण समाधानाने जगता यावेत यासाठी हा वृद्धाश्रम उभारला जावा असे खेत्रमोहन यांना वाटते.
हक्काची जमीन सरकारच्या नावे करून उभारले जाणार वृद्धाश्रम
मुरारीपूर येथे खेत्रामोहन, आपला मुलगा आणि सुनेसोबत राहतात. मात्र मुलगा आणि सुनेकडून त्यांना सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने, आपल्यासारखीच अवस्था असणाऱ्या इतर वृद्धांचे हाल होऊ नयेत यासाठी एक वृद्धाश्रम उभारण्याची खेत्रामोहन यांची इच्छा आहे. याच कारणास्तव त्यांनी आपल्या मालकीची सर्व जमीन राज्य सरकारच्या नावे केली आहे. घरामध्ये खेत्रामोहन यांना अतिशय जाच केला जात असल्याने सध्या त्यांच्या राहण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंडीखोले येथून जवळच असलेल्या एका वृद्धश्रमात केली गेली आहे. तसेच मृत्यू पावल्यानंतर आपल्या अस्थी मुलगा आणि सुनेच्या हवाली न केल्या जाण्याची विनंतीही खेत्रमोहन यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
