लीडस् : विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानच्या संघाला विजय आवश्यक असून पाकिस्तानचा या सामन्याच्या निकालावर विश्वचषक स्पर्धेमधील त्यांचा पुढचा प्रवास ठरणार आहे. आता पाकिस्तानचे अवघे दोन सामने उरले असून जर या स्पर्धेत त्यांना टिकून राहयचे असेल तर त्या सामन्यात त्यांना विजय मिळवावाच लागेल. आतापर्यंत एकही विजय अफगाणिस्तानने मिळवला नसला तरी बलाढ्य संघांना त्यांनी झुंजवले आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारताविरोधात गरळ ओकली आहे. अफगाणिस्तानला प्रशिक्षण देताना भारताने फलंदाजीत कच्चे सोडल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या संघावर बंदी येईल असेही त्याने म्हटले आहे.
शोएब अख्तर म्हणाला की, कधीकाळी अफगाणिस्तानचे खेळाडू पेशावर, रावळपिंडी शिकत होते. त्यांना आम्ही शिकवत होतो पण आता ते दिल्ली आणि नोएडात शिकतात. त्यांच्यावर खूप पैसा भारताने खर्च केला पण त्यांच्या फंलदाजीत सुधारणा करू शकले नाहीत.
Shoaib Akhtar's message for Afghanistan and their cricket board ahead of clash with Pakistan. pic.twitter.com/cNynasUWbc
— Ashar Jawad (@AsharJawad) June 28, 2019
शोएब अख्तर म्हणाला की, अफगाणिस्तानच्या संघातील खेळाडूंचे जर ओळखपत्र काढले तर त्यांच्यावर बंदी येईल. अफगाण क्रिकेट बोर्डाच्या सीईओसह सर्वांनाच अख्तरने सांगितले की माध्यमात बोलताना जरा सांभाळून कारण तुमचे सर्व नातेवाईक पेशावर आणि कराचीतले निघतील. त्यामुळे संघावर बंदी येईल.
30 लाख अफगाणिस्तानच्या लोकांना आम्ही आमच्या घरात जागा दिली. आमच्या ते जवळचे आहेत पण सामन्यावेळी कोणतेही नाते, प्रेम नसेल कारण पाकिस्तानला दोन गुण हवे आहेत. अफगाणिस्तान पहिल्यांदा पेशावर, रावळपिंडीत सराव करत होते. आता ते डेहराडूनला सराव करतात. त्याशिवाय बीसीसीआय त्यांना मदत करते.