
मँचेस्टर – गुरुवारी विश्वचषक स्पर्धेत झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात १२५ धावांनी भारताने विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाला भारतीय संघाचे २६९ धावांचे आव्हान पेलवले नाही. १४३ धावांवर विंडीजचा संपूर्ण संघ गारद झाला. वेस्ट इंडिज संघ या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटवर या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे.
कार्लोस ब्रेथवेटवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
आयसीसीच्या आचारसंहिता कलम २.८ चे सामन्यादरम्यान उल्लंघन केल्याने ब्रेथवेटवर ही कारवाई करण्यात आली आहे. ब्रेथवेटला त्यामुळे सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. आपली चुक कार्लोसने मान्य केली असून दंडही भरण्यासाठी तयार झाला आहे. या कारणाने या प्रकरणात पुढील कारवाई होणार नाही.
