आता परीक्षांचा मोसम सुरु होत आहे. विद्यार्थी मंडळी अभ्यासामध्ये गुंतली असतानाच त्यांचे आरोग्य, आहार आणि इतर वेळापत्रक सांभाळण्याची जबाबदारी मात्र पालक कसोशीने सांभाळत असतात. या काळामध्ये मुलांच्या आहाराबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी आहारामध्ये काही पदार्थ समाविष्ट केल्याने लाभ होऊ शकतो.
नाशपाती हे फळ क्षारांचे उत्तम स्रोत आहे. तसेच यामध्ये क जीवनसत्वाची मात्रा ही मुबलक प्रमाणात आहे. अनेक अँटी ऑक्सिडंट्सनी युक्त असलेले हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि मानसिक तणाव कमी करण्यास सहायक आहे. त्यामुळे मुलाच्या आहारामध्ये या फळाचा समावेश अवश्य करावा.
नाशपाती प्रमाणेच चेरी हे फळ मुलांना खाण्यास जरूर द्यावे. या फळामध्ये असलेले मेलाटोनीन चांगली आणि शांत झोप लागण्यास सहायक असते. जर झोप चांगली झाली असली, तर शरीरावरील आणि मनावरील तणाव कमी होऊन मन प्रफुल्लीत राहते आणि शरीराची मरगळ दूर होते.
गोजी बेरीज हे एक चायनीज फळ असले, तरी आजकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध असणारे आहे. या फळामध्ये क्षार आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणामध्ये आहेत. याच्या सेवनाने शरीरातील तंत्रिका (nerves) तणावमुक्त होण्यास मदत होते.
या काळामध्ये मुलांच्या आहारामध्ये दुध आणि दुग्धजन्य पदार्थ आवर्जून समाविष्ट करावयास हवेत. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम आणि ब १२ जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहेत. यामुळे मेंदू आणि शरीरातील कोशिका सक्रीय राहण्यास मदत होते. आहारामध्ये अंडी समाविष्ट केल्याने मुलांना आवश्यक प्रथिने, कोलीन, ब जीवनसत्वे, मोनो व पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स मिळत असतात. यामुळे शरीराची नर्व्हस सिस्टम सुरळीत चालते. हे सर्व खाद्यपदार्थ मनावरील आणि शरीरावरील तणाव कमी करून मेंदू सक्रीय राहण्यास मदत होते.