आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सदैव नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. प्रत्येक घरामध्ये नेमाने होत असणारी पूजा अर्चा, धार्मिक कार्ये या सर्वांमागे, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, घरामध्ये राहणाऱ्या मंडळींना उत्तम आरोग्य लाभावे आणि सर्वांचा भाग्योदय व्हावा, येणारे अनिष्ट टळावे, हाच उद्देश असतो. सर्व धर्मांमध्ये पूजा पाठ, दानधर्म आणि ध्यान धारणा यांना मोठे महत्व दिले गेले आहे. त्याचबरोबर असे ही काही उपाय सांगण्यात आले आहेत, जेणेकरून घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहील. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने हे रहस्य युधिष्ठिराला सांगितले असल्याची आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार काही वस्तू घरामध्ये सदैव ठेवल्याने घरामध्ये सुख नांदते, लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहत असल्याचे म्हटले जाते.
घरामध्ये गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप नेहमी असावे. गायीच्या दुधापासून बनविलेल्या तुपाला अमृत म्हटले गेले आहे. घरामध्ये होणाऱ्या होमहवनासाठी या तुपाचा वापर करावा, तसेच देवासमोर दिवा लावतानाही या तुपाचा वापर नित्य करावा. यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जेचे संचरण होत असल्याचे म्हटले जाते.
या तुपाप्रमाणेच घरामध्ये शुद्ध मधही नेहमी असावा. वास्तूदोष नाहीसे करण्यासाठी मध उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच पूजेमध्ये मधाचा वापर करण्याचा प्रघात आहे.
घरातील वातावरणाच्या शुद्धीसाठी घरामध्ये गंगाजल असलेला लहानसा कलश ठेवण्याची पद्धत आहे. तसेच शुभप्रसंगी आणि एरव्ही सुद्धा घरातील वातावरण शुध्द करण्यासाठी हे गंगाजल घरभर शिंपडण्याची पद्धत आहे.
देवघरामध्ये शंख असणे, आणि घरामध्ये नियमितपणे केला जाणारा शंखनाद घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी करतो. देवघरामध्ये शंख ठेऊन त्याची नेमाने पूजा केल्यास धनप्राप्ती होते अशी मान्यता आहे. शंख भगवान विष्णूंना प्रिय असून, हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे.
पूजेसाठी वापरले जाणारे चंदनही घरामध्ये नेहमी असू द्यावे.