
देशात ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याच्या निर्णयाला आज १ महिना पूर्ण होत आहे. नोटबंदीमुळे देशात डझनावारी मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात असून नोटबंदी मुळे मृत्यूला कवटाळणार्या अलिगढ येथील रजिया अकबर हुसेन या महिलेच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारने ५ लाख रूपये भरपाई जाहीर केली आहे. नोटबंदीमुळे मृत्यू ओढविल्यानंतर दिली गेलेली देशातली ही पहिली भरपाई मानली जात आहे.
नोटबंदीमुळे मृत्यू झाल्याची पहिली भरपाई उत्तर प्रदेशात
मिळालेल्या माहितीनुसार नोटबंदी लागू झाल्यानंतर रोजदारीचे काम करणार्या रजिया यांनी त्यांच्याकडील ५०० रूपयांच्या सहा नोटा बदलण्यासाठी सतत तीन दिवस बँकेसमोर रांगेत राहूनही त्यांना नोटा बदलता आल्या नव्हत्या. त्यामुळे निराश होऊन रजिया यांनी स्वतःला पेटवून घेतले होते. दिल्लीत त्यांना उपचारासाठी आणले गेले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरची वाईट आर्थिक परिस्थिती व आपलेच पैसे असूनही बँक व एटीएम समोर रांगा लावूनही ते वेळेत हातात न पडण्याची वेळ आल्याने अखिलेश सरकारने त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून पाच लाख रूपये देण्यात येत असल्याची घोषणा केली
अनेक विरोधी पक्षांकडूनही नोटबंदी मुळे मृत्यू आलेल्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी केली असतानाच उत्तर प्रदेश सरकारने अशी भरपाई दिली आहे. यामुळे अन्य राज्य सरकारेही या बाबत विचार करून कृती करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
