
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्ष (आठवले), रासप (महादेव जानकर), शिवसंग्राम (विनायक मेटे) व शेतकरी संघटना (खा.राजू शेट्टी) यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली होती पण या चारही मित्रपक्षांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न दिल्याने हे पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत रासप वगळता इतर कोणत्याही मित्रपक्षाचा एकही सदस्य विधानसभेवर अथवा विधान परिषदेवर निवडून आलेला नाही. विधान परिषदेच्या रिक्त होणा-या जागा पाहता या मित्रपक्षाच्या नेत्यांचा समावेश कसा करावा याबाबतचा पेच भाजपच्यापुढे आहे आणि म्हणून मंत्रीपदाऐवजी महामंडळे देण्याचा भाजपचा विचार असून घटक पक्षांना तो मान्य नाही.
नाराज घटकपक्ष महायुतीमधून बाहेर पडणार!
रामदास आठवले ह्यांना केंद्रात व राज्यात मंत्रीपद हवे आहे. परंतु, विधान परिषदेची एकूण स्थिती पाहता या चार मित्रपक्षाच्या सदस्यांना मंत्रिमंडळात घेणे शक्य दिसत नाही. यावरुन सध्या मित्रपक्ष नाराज आहे. मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार जानेवारी २०१५च्या शेवटच्या आठवडय़ात होईल, असे सांगण्यात येत असले तरी सहा महिन्यांमध्ये वरील मित्रपक्षाच्या मंत्र्यांना विधान परिषद किंवा सभेवर निवडून आणावे लागेल आणि ते सध्या शक्य दिसत नसल्यामुळेच कोंडी झाली आहे.
