
नवी दिल्ली – भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने २०१४ मधील संमिश्र यशानंतर आता आपण आपले लक्ष २०१५ सालाकडे केंद्रित केले आहे आणि मावळत्या वर्षाच्या तुलनेत आगामी वर्षात जास्तीत जास्त स्पर्धा जिंकण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आपले पुढील मुख्य लक्ष्य २०१६ साली ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओ शहरात होणार्या ऑलिम्पिककडे लागले असल्याचेही तिने सांगितले.
सायनाने केले २०१५ सालाकडे लक्ष केंद्रित
याशिवाय देशातील उदयोन्मुख खेळाडूंना तिने प्रशिक्षण देण्याचेही ठरविले आहे. त्यासाठी तिने नोएडास्थित गौड सिटीमध्ये आपली पहिली बॅडमिंटन अकादमी काढण्याची घोषणा केली आहे. २०१४ साल माझ्यासाठी खूप चांगले राहिले. या वर्षात मी तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या. यात इंडिया ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन व चीन ओपन स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय मी आशियाड स्पर्धेत कांस्य पदक मिळविले. वर्षाच्या सुरुवातीला माझे जागतिक मानांकन नववे होते आणि आता मी चौथ्या स्थानावर पोहोचली आहे, असेही सायनाने आपल्या अकादमीच्या घोषणेनंतर बोलताना सांगितले.
