गौतम गंभीरने संधी देताच हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य, जिंकली मने


अखेर जे अपेक्षित होते, तेच घडले, टीम इंडियाने श्रीलंकेचा टी-20 मालिकेत एकतर्फी 3-0 असा पराभव केला. संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या विजयाने खूप खूश दिसत होता. तिसऱ्या टी-20 सामन्यातील विजयानंतर गंभीरने विशेषत: संघाचे अभिनंदन केले. पण यानंतर मुख्य प्रशिक्षकाने असे काही केले, ज्याची कदाचित काही चाहत्यांना अपेक्षा असेल. त्याने ड्रेसिंग रूममधून हार्दिक पांड्याला या विजयावर काही बोलण्यास सांगितले. त्यानंतर हा अष्टपैलू खेळाडू टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवचे कौतुक करताना दिसला.

हार्दिक पांड्याने तिसऱ्या टी20 मध्ये संघाच्या विजयाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले, तो म्हणाला की पल्लेकेलेमध्ये पहिल्या डावात फलंदाजी करणे कठीण होते आणि जेव्हा आम्ही अडचणीत होतो, तेव्हा शुभमन गिल आणि रियान पराग यांनी शानदार फलंदाजी करून संघाला एवढी धावसंख्या गाठण्यास मदत केली. आम्ही जिथे लढू शकतो, तिथे पोहोचलो. खालच्या फळीतील फलंदाजांनीही चांगले योगदान दिल्याचे हार्दिक म्हणाला. वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांनी अप्रतिम फलंदाजी केली. यानंतर त्याने सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाला आणि गोलंदाजांना फिरवण्याच्या क्षमतेला सलाम केला. हार्दिक म्हणाला की, अशा विजयांनी संघ एका स्तरावर जातात. हार्दिकने टीम इंडियाच्या खेळाडूंना वनडे मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेथेही असेच काम पूर्ण करू असे सांगितले.


टी-20 मालिकेनंतर आता सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या याच्यासह चार खेळाडू भारतात परतणार आहेत, कारण त्यांना वनडे मालिकेत संधी दिली गेली नाही. मात्र, भारतात परतण्यापूर्वी गौतम गंभीरने या खेळाडूंना बांगलादेश मालिकेसाठी तयार राहण्यास सांगितले. गंभीर म्हणाला की, बांगलादेश टी-20 मालिका सुरू व्हायला अजून वेळ आहे आणि तुम्हाला खूप सुट्या आहेत, पण खेळाडूंनी त्यांच्या फिटनेस आणि कौशल्यावर काम करत राहायला हवे. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आता बांगलादेशविरुद्ध ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेत खेळताना दिसणार आहेत.