आज मला ते 2 प्रसंग आठवत आहेत… सोनिया गांधींनी फायनलपूर्वी टीम इंडियाला दिला खास संदेश


आज तो दिवस आला आहे, ज्याची क्रिकेटप्रेमी जवळपास महिनाभरापासून वाट पाहत होते. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. भारताच्या विजयासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. नेते असोत की कलाकार, प्रत्येकजण आपापल्या परीने टीम इंडियाला शुभेच्छा देत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही व्हिडिओ संदेश जारी करून टीम इंडियाला खास संदेश दिला आहे.


काँग्रेसने सोनिया गांधी यांचा एक व्हिडिओ संदेश X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला आहे. सोनिया म्हणाल्या, विश्वचषकातील तुमच्या खेळासाठी आणि सांघिक कामगिरीबद्दल मी टीम इंडियाच्या खेळाडूंचे अभिनंदन करते. तुम्ही संपूर्ण देशाला सतत आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण दिले आहेत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंतच्या तुमच्या प्रवासाने एकता, मेहनत आणि दृढनिश्चयाचा संदेश दिला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी टीम इंडियाचे अभिनंदन करते.

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, आज मला 1983 आणि 2011 मधील ते दोन प्रसंग आठवत आहेत, जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला होता आणि संपूर्ण देश आनंदाने उड्या मारत होता. ही संधी पुन्हा चालून आली आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्याने नेहमीच देशाला जोडण्याचे काम केले आहे. आज फाइनल आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. टीम इंडियाच्या यशासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत. विश्वविजेते होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण संघात आहेत. आज फक्त टीम इंडियाच जिंकेल.