भारतीय संघ आज विश्वचषक स्पर्धेतील आपला चौथा सामना खेळत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होत आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत आहे आणि या सामन्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यामुळे विराट कोहलीला गोलंदाजी करावी लागली. विराटने नवव्या षटकात गोलंदाजी केली.
विराटने बऱ्याच दिवसांनी गोलंदाजी केली आहे. तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. वास्तविक हार्दिक पांड्या डावातील नववे षटक टाकत होता. तीन चेंडूंनंतर तो जखमी झाला. त्याच्या घोट्याला दुखापत होऊन, तो बाहेर गेला. यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीला ओव्हर पूर्ण करण्यासाठी बोलावले. उरलेले तीन चेंडू त्याने टाकले.
या सामन्यात विराट कोहलीने बऱ्याच कालावधीनंतर गोलंदाजी केली. यापूर्वी त्याने 31 ऑगस्ट 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी केली होती. त्याच्या नावावर एकदिवसीयमध्येही चार विकेट आहेत. टी-20मध्येही त्याने चार विकेट घेतल्या आहेत. या मॅचमध्ये त्याने फारशा धावा दिल्या नाहीत. कोहलीने तीन चेंडूंवर केवळ दोन धावा दिल्या. पण कोहली ज्या परिस्थितीत गोलंदाजी करायला आला होता, ती परिस्थिती भारतासाठी चांगली नव्हती.
याआधी मात्र कोहलीने गेल्या वर्षी टी-20 मध्ये गोलंदाजी केली होती. एशिया कप-2022 मध्ये त्याने हाँगकाँगविरुद्ध गोलंदाजी केली होती. मात्र, त्याने सहा वर्षांनंतर वनडेत गोलंदाजी केली आहे. कोहलीने 2016 मध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्येही गोलंदाजी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने शेवटचे षटक टाकले. मात्र, बांगलादेशविरुद्ध तो तीन चेंडू टाकून गोलंदाजीकडे परतला नाही.