आता शिवसेनेने गमावले विरोधी पक्षनेतेपद, राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे कमान


मुंबई – नुकतीच मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमावलेल्या शिवसेनेकडे आता विरोधी पक्षनेतेपद नाही. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची सोमवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. याआधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सभागृहात महत्त्वपूर्ण बहुमत चाचणी जिंकली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 164-99 अशा फरकाने बहुमत चाचणी जिंकली.

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव ठेवला. नंतर त्यास विधानसभेने मान्यता दिली. शरद पवार यांनी काल जयंत पाटील, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. पक्षाचा वरिष्ठ नेता विरोधकांचा चेहरा व्हावा, अशी विरोधकांची इच्छा होती.

फ्लोर टेस्ट दरम्यान, 288 सदस्यांच्या सभागृहात, 164 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर 99 आमदारांनी विरोधात मतदान केले. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तीन आमदारांनी मतदानाला अनुपस्थित राहिले, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह 21 आमदार गैरहजर राहिले. विश्वासदर्शक ठरावाला बहुमत मिळाले, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

नुकतेच शिवसेनेच्या एका आमदाराच्या निधनानंतर विधानसभेतील आमदारांचे सध्याचे संख्याबळ 287 वर आले आहे, त्यामुळे बहुमतासाठी 144 मतांची आवश्यकता आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात शिवसेनेविरोधात बंडखोरी केली होती. बहुसंख्य आमदारांनी त्यांना साथ दिली, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 30 जून रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदार अबू आझमी आणि रईस शेख (दोन्ही समाजवादी पक्षाचे नेते) आणि शाह फारूक अन्वर (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन) यांनी सभागृहात फ्लोर टेस्ट दरम्यान मतदानात भाग घेतला नाही.

या वेळी अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दीकी, राजू आवळे, मोहन हंबर्डे, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर आणि शिरीष चौधरी हे काँग्रेसचे 11 आमदार गैरहजर राहिले. चव्हाण आणि वडेट्टीवार उशिरा आल्याने मतदानाच्या वेळेपर्यंत त्यांना सभागृहात प्रवेश करता आला नाही.

याशिवाय अनिल देशमुख, नवाब मलिक, दत्तात्रेय भाने, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे मतदानावेळी गैरहजर राहिले. देशमुख आणि मलिक हे वेगवेगळ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर सध्या तुरुंगात आहेत. भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे गंभीर आजारी असल्याने सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्याने मतदान करू शकले नाहीत. एआयएमआयएमचे नेते आणि आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल हेही अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत.