INDS vs NHNTS : दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा 10 धावांनी विजय, फलंदाज पूर्णपणे अपयशी, हर्षल पटेल चमकला


नॉर्थम्प्टन – इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारताचा मुख्य संघ एजबॅस्टन येथे कसोटी सामना खेळत असून तीन दिवसांच्या खेळानंतर भारत मजबूत स्थितीत आहे. त्याचवेळी आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणारा संघ इंग्लंडमध्ये सराव सामना खेळत आहे. दुसऱ्या टी-20 सराव सामन्यात भारतीय संघाने 10 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हर्षल पटेलने चेंडू आणि बॅटने अप्रतिम कामगिरी करत टीम इंडियाच्या विजयात सर्वात महत्त्वाचे योगदान दिले.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने आठ गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात नॉर्थॅम्प्टनशायरचा संघ 139 धावांत गारद झाला आणि भारतीय संघाने तीन चेंडू राखून सामना जिंकला.

भारतीय फलंदाज ठरले अपयशी
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर राहुल त्रिपाठी आणि सूर्यकुमार यादवही लवकर बाद झाले. आठ धावांवर भारतीय संघाच्या तीन विकेट पडल्या होत्या. यानंतर इशान किशन आणि कर्णधार दिनेश कार्तिकने भारताचा डाव सांभाळला. किशनने कसोटी शैलीत 20 चेंडूत 16 धावा केल्या. त्याचवेळी, कार्तिक 26 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. व्यंकटेश अय्यरलाही 22 चेंडूत केवळ 20 धावा करता आल्या.

यानंतर क्रीझवर आलेल्या हर्षल पटेलने आपल्या बॅटचे दर्शन घडवत 36 चेंडूत 54 धावा केल्या. त्याच्या अर्धशतकामुळे भारताची धावसंख्या 149 धावांपर्यंत पोहोचली. नॉर्थम्प्टनशायरच्या ब्रँडन ग्लोव्हरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. बक आणि फ्रेडी हेल्ड्रिक यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. भारताचे दोन महत्त्वाचे फलंदाज सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांना खातेही उघडता आले नाही. पॉवरप्लेमध्ये भारताने तीन गडी गमावून अवघ्या 27 धावा केल्या.

गोलंदाजांनी मिळवून दिला भारतीय संघाला विजय
150 धावांचा पाठलाग करताना नॉर्थमटनशायरच्या संघाला विजय मिळवणे सोपे होते, पण भारतीय गोलंदाजांनी ते होऊ दिले नाही. भारताला 11 धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट मिळाली आणि पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाच्या चार विकेट्स झाल्या होत्या. नॉर्थहॅम्प्टनशायरच्या फलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत 49 धावा केल्या होत्या, पण विकेट पडल्यामुळे हा संघ नंतर फार काही करू शकला नाही. सैफ जबने सर्वाधिक 33 आणि एमिलियो गेने 22 धावा केल्या. शेवटी, हा संघ 19.3 षटकात 139 धावांवर आटोपला आणि भारताने 10 धावांनी सामना जिंकला.

भारतासाठी सर्व गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी केली आणि प्रत्येकाने विकेट घेतल्या. तीन षटकांत 27 धावा देणारा प्रसिद्ध कृष्णा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंग, आवेश खान, हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हर्षल हा ठरला विजयाचा नायक
भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यान शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या हर्षल पटेलने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने 3.3 षटकात फक्त 23 धावा दिल्या आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकात नॉर्थम्प्टनशायरला विजयासाठी 11 धावांची गरज होती आणि संघाचे बहुतांश फलंदाज क्रीजवर होते. असे असतानाही हर्षलने पहिल्या दोन चेंडूत एकही धाव दिली नाही आणि तिसऱ्या चेंडूवर त्याला बाद करून भारताला विजय मिळवून दिला.

फलंदाजांच्या फ्लॉप शोने वाढवली चिंता
या सामन्यात भारताचे सर्व महत्त्वाचे फलंदाज फ्लॉप ठरले. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. इशान किशन, राहुल त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर या तिघांनीही निराशा केली. दिनेश कार्तिकलाही सेट झाल्यानंतर डाव व्यवस्थित पूर्ण करता आला नाही. तो 12व्या षटकात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यातील बहुतांश फलंदाज टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघात असून या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.