हे भारतीय क्रिकेटवीर दोन वेळा चढले बोहल्यावर

फुटबॉलनंतर क्रिकेट हा दोन नंबरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ असून भारतात घरोघरी क्रिकेटवेडे पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी क्रिकेट सामने हा सण तर क्रिकेट खेळाडू जणू परमेश्वर आहेत. परिणामी क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्याची मोठ्या चवीने हे रसिक चर्चा करतात. अनेकांना हे माहिती नसेल कि भारतीय क्रिकेटपटूंपैकी पाच क्रिकेटपटू असे आहेत जे एकदा नव्हे तर दोन वेळा बोहल्यावर चढले आहेत. यात कप्तान, गोलंदाज, फलंदाज, विकेटकीपर असे सर्व खेळाडू आहेत.

माजी सलामी फलंदाज अरूणलाल यांनी केलेला दुसरा विवाह सध्या चर्चेत आहे. अरूणलाल ६६ वर्षांचे असून त्यांनी परिवाराच्या संमतीने ३८ वर्षीय बुलबुल हिच्यासोबत दुसरा विवाह केला. त्यांचा पहिला विवाह रीना यांच्याबरोबर झाला आहे. माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याने पहिला विवाह १९९९ मध्ये जोत्स्ना बरोबर केला असून दुसरा विवाह २००८ मध्ये पत्रकार माधवी पत्रावली हिच्यासोबत केला आहे.

विकेटकीपर दिनेश कार्तिक तीन वर्षानंतर पुन्हा टीम मध्ये आला असल्याने चर्चेत आहे. २००७ मध्ये त्याने निकिता बंजारा हिच्या सोबत विवाह केला होता पण ५ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि त्याने २०१५ मध्ये दीपिका पल्लीकाल हिच्यासोबत दुसरा विवाह केला आहे. माजी कप्तान अझरूद्दीन यांचा पहिला विवाह नौरीन बरोबर १९८७ मध्ये झाला होता. नंतर त्याने संगीता बिजलानी सोबत विवाह करता यावा म्हणून नौरीनला १९९६ मध्ये घटस्फोट दिला. पण संगीता बरोबर सुद्धा त्याचा २०१० मध्ये घटस्फोट झाला.

सलामीचा डावखुरा धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळी याचा पहिला विवाह नोएला लुईस बरोबर झाला होता. त्याने मॉडेल आंद्रिया हेविट बरोबर दुसरा विवाह केला आहे.