रिकाम्या पोटी हे अन्न टाळा…


सकाळी उठल्याबरोबर भूक लागलेली असते आणि रात्रीच्या उपवासाने भडकलेल्या भुकेल्या पोटी आधी काय खावे हा प्रश्‍न सर्वांना सतावत असतो. भूक तर एवढी भडकलेली असते की समोर दिसेल ते खाण्याचा मोह होतो. सकाळी उठल्याबरोबर आधी चहा पिला जातो. मात्र रिकाम्या पोटी चहा पिऊ नये म्हणून चहाच्या आधी दोन बिस्किटे खाण्याचा सल्ला दिला जातो. बिस्किटे न मिळाल्यास तसेच रिकाम्या पोटी थोडेसे पाणी पिऊन चहा किंवा कॉफी प्राशन केली जाते. मात्र अशा प्रकारे चहा, कॉफी घेता कामा नये. उपाशी पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास पित्त वाढते आणि दिवसभर अपचनाचा त्रास व्हायला लागतो.

चहा आणि कॉफी हे दोन पेये आपल्या शरीरातील आवश्यक ते ऍसिड पाझरण्यास प्रतिबंध करतात. म्हणून अपचन वाढत जाते. काही वेळा सकाळी उपाशी पोटी एक केळे खावे असा सल्ला दिला जातो. तो चांगला आहे. कारण सकाळी उपाशीपोटी केळे खाल्ल्यास पचनशक्ती बळावते. केळीतील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे या कामी आपल्याला उपयोगी पडतात. टोमॅटो ही एक अशी फळभाजी आहे की ती डायनिंग टेबलाच्या आसपास सापडतेच आणि सकाळी खायला काहीच मिळाले नाही तर असा उपाशी माणूस पटकन एक टोमॅटो उचलून खाऊ शकतो. परंतु असे टमाटे खाणे टाळले पाहिजे. कारण टमाट्यात क जीवनसत्त्व असते आणि ते पोटातील ऍसिडचे प्रमाण वाढवून अपचनास कारणीभूत ठरते.

लिंबू, संत्रे, मोसंबी अशी सायट्रिक ऍसिड असणारी फळे सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी खाल्ली तर गॅसेसचा त्रास होऊ शकतो. त्याच बरोबर काकडी हीसुध्दा त्रासदायक असते. कारण काकडीमध्ये अमायनो ऍसिड असतात आणि त्या अमायनो ऍसिडमुळे पोटदुखी होऊ शकते. हृदयालासुध्दा त्रास होतो. तेव्हा सकाळी उठल्याबरोबर काही तरी खाण्याची गरज रोज जाणवत असेल तर असे काही तरी खाण्यापेक्षा झोपण्यापूर्वीच त्याची योजना करावी आणि सकाळी उठल्याबरोबर नियोजनपूर्वक ठरवलेला पदार्थ किंवा फळ किंवा बिस्किट खावे. डॉक्टर मंडळींच्या मते तर उठल्याबरोबर सफरचंद खाणे योग्यच परंतु सर्वांना सफरचंद परवडत नाही म्हणून दोन बिस्किटे खावीत. बिस्किट हा परवडणारा पदार्थ आहे. अगदी गरिबातल्या गरिबांना परवडतील अशीही बिस्किटे उपलब्ध असतात आणि श्रीमंतांना आवडतील अशीही किंमती बिस्किटे उपलब्ध असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment