महाराष्ट्रातील इतर राज्याच्या लोकांची काळजी कोणीही करण्याची गरज नाही – आदित्य ठाकरे


मुंबई – राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. अशातच मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय सुरू करण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी यावर कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या कामांची आठवण करून देत टोला लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटते देशातील अनेक राज्यांमध्ये अशी अनेक सदने आणि कार्यालये असतात. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा कोरोनाचा काळ होता, देशातील अनेक राज्यांमधील कामगार महाराष्ट्रात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आम्ही सर्वांनी त्यावेळी सर्वच लोकांची काळजी घेतली.

कोरोना काळात महाराष्ट्रात इतर देशातील नागरिक असो किंवा इतर राज्यातील कामगार असो, सर्वांची काळजी आम्ही घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात असलेल्या इतर राज्यातील लोकांची काळजी कोणीही करण्याची गरज नाही. येथे सर्व ठीक सुरू आहे आणि सर्वजण देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करत असल्याचे म्हणत नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, इतर पक्षांवर मी सहसा बोलत नाही. येथे जे महत्त्वाचे विषय आहे त्यावर मी बोलेल. पुन्हा एकदा अयोध्येला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. जेव्हापासून अयोध्येचा संघर्ष सुरू होता, तेव्हापासून शिवसेना सतत तेथे जात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याआधी अयोध्येला गेले होते. त्यानंतर न्यायालयाचा निकाल आला.

अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे न्यायालयाच्या निकालामुळे निर्माण सुरू झाले आहे. आणि संघर्ष संपला, आता आम्ही आशीर्वाद घ्यायला जाणार आहोत. जे महाराष्ट्रात आम्ही करत आहोत, ते देशात करू इच्छित आहोत. त्या रामराज्यासाठी आम्ही आशीर्वाद घ्यायला 10 जुनला अयोध्येला जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

एमआरआय विभागात नवनीत राणा यांनी केलेल्या फोटो सेशनबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, आपण येथे एवढे चांगले काम करत असताना एवढ्या शुल्लक गोष्टीवर चर्चा करणे योग्य नाही. महाराष्ट्र खूप मोठा आहे. आपण आज नांदेड आणि आजूबाजूच्या परिसरासाठी 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय निर्माण करत आहोत. नुकतेच त्याचे भूमिपूजन झालेले आहे. या कामाला वेग येऊन लवकरच हे काम पूर्ण होईल आणि हे रुग्णालय लोकांच्या सेवेत रुजू करू. येथे ऑपरेशन थिएटरपासून सिटीस्कॅनपर्यंत सर्व सुविधा असणार आहेत.