राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही – शरद पवार


कोल्हापूर – औरंगाबाद येथे झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती, त्यानुसार त्यांच्या अयोध्या दौऱ्याची पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. दरम्यान भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जोपर्यंत राज यांचा माफीनामा येत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांची भेट घेऊ नये, असा सल्लाही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व घडामोडींवर कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि त्याला भाजप खासदाराकडून होणाऱ्या विरोधासंबंधी शरद पवारांना विचारण्यात आले असता त्यावर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही. माझा नातूही काल अयोध्येत होता, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान राज्यात सध्या भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, कोणाचे आर्थिक नुकसान होत नाही, पण प्रश्न भावनांचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी शिर्डीमध्ये प्रार्थना होते. या निर्णयामुळे ती प्रार्थना बंद झाली. लोक हे चालू करा सांगत आहेत. काही लोकांची भावनेची केंद्र असतात. अनेक काळापासून सुरु असलेल्या पद्धती सुरु राहाव्यात असे, त्यांना वाटत असते. त्या एखाद्या गोष्टीमुळे बंद झाल्या, तर त्याचे परिणाम दिसतात आणि महाराष्ट्रात ते उमटू लागले आहेत.

लोकांच्या प्रश्नासाठी आतापर्यंत चळवळी व्हायच्या. त्यावेळी हनुमान चालिसा वैगेरे गोष्टी होत नव्हत्या. सामान्य लोकांचे प्रश्न महागाई, बेकारी, कायदा-सुव्यवस्था आहेत. हे सगळे प्रश्न बाजूला ठेवले आणि अयोध्येचे काये झाले, प्रार्थना म्हणा, याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना मुलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यामुळे लोकांचे लक्ष वळण्यासाठी या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जात असल्याचे सांगत शरद पवारांनी मोदी सरकावर निशाणा साधला.