खासदार नवनीत राणांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, पोलीस ठाण्यात अत्याचार आणि अपशब्दांचा वापर


मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांच्यावर खार पोलीस ठाण्यात आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. नवनीत यांनी पत्राद्वारे शिवसेनेवरही ताशेरे ओढले आहेत. नवनीत यांनी लिहिले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आपल्या हिंदुत्वाच्या तत्त्वांपासून पूर्णपणे विचलित झाली आहे, असा माझा विश्वास आहे. त्या म्हणाल्या की, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडणूकोत्तर युती केली आहे आणि आता तसे करणे त्यांची मजबूरी आहे.

पत्राद्वारे करण्यात आले हे आरोप
मी अनुसूचित जातीची असल्याच्या कारणावरुन खार पोलीस ठाण्यात पिण्याच्या पाण्यासारखे मूलभूत मानवी हक्क नाकारण्यात आल्याचे नवनीत राणांनी सांगितले. त्यांनी पुढे आरोप केला की, जेव्हा आपल्या रात्री बाथरूम वापरायचे होते, तेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीकडे लक्ष दिले नाही. नवनीत राणांनी पुढे सांगितले की, मला पुन्हा अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली, मला सांगण्यात आले की आम्ही खालच्या अनुसूचित जातीतील लोकांना आमचे बाथरूम वापरू देत नाही.

न्यायालयीन कोठडीत आहे नवनीत राणा
अलीकडेच नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांविरुद्ध भादंवि कलम १२४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम देशद्रोहासाठी लावण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर राणा दाम्पत्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती, मात्र शेकडो शिवसैनिक राणांच्या घराबाहेर जमले आणि गोंधळ घातला. प्रदीर्घ नाट्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या आमदार पतीला अटक करण्यात आली.