माझी कधीच एका शब्दानेही बाबासाहेब पुरंदरेंशी चर्चा झाली नाही – जेम्स लेन


मुंबई – मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात सध्या सुरु आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. राज ठाकरेंनी ठाण्यात पार पडलेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठा वाद होताना दिसत आहे. एकीकडे राज ठाकरे पुरंदरेंनी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली, असा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: लेख जेम्स लेनने या वादावर भाष्य केले आहे. जेम्स लेनची ई-मेलद्वारे इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी मुलाखत घेतली आहे.

बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. चुकीचा इतिहास त्यांनी सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला, ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. आजपर्यंत महाराजांवर रणजित देसाईंनी लिहिले, बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी संभाजी महाराजांवर लिहिले. आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज प्रत्येकाने लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसाने लिहिले आहे, ते बघायचे आहे. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चालले आहे? या महाराष्ट्रातील जातीपातीचा भेद तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसाने गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता.

इतिहास वेगळय़ा दिशेने नेण्याचा प्रयत्न शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला होता. जिजामातांनी शिवाजी महाराजांना घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असे पुरंदरे यांनी लिहून ठेवले होते. शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण जेम्स लेनने केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. पुरंदरे यांनी त्यावर कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान असल्याचे शरद पवार यांनी म्ह़टले होते.

मनसेने यानंतर २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेले एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

१६ एप्रिलला इंडिया टुडेला जेम्स लेन यांनी दिलेल्या मुलाखतीत २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केला आहे.

तुम्हाला पुस्तकातील वादग्रस्त माहिती कोणी पुरवली याबद्दल विचारले असता जेम्स लेन यांनी सांगितले की, हा प्रश्न तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. मला कोणीही माहिती पुरवली नाही. माझे पुस्तक कथा आणि लोक ते कसे सांगतात; त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात याबद्दल होते. उदाहरणार्थ…काही लोक शिवाजी महाराजांचा संबंध रामदास गुरुंसोबत जोडतात, तर काहीजण तुकाराम महाराजांसोबत. यापैकी कोणती माहिती योग्य आहे आणि एक गट ‘अ’ कथानकाला का पसंती देतो आणि दुसरा गट ‘ब’ ला का यात मला रस नाही.

तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, माझे पुस्तक जो कोणी नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचे लक्षात येईल. शिवाजी महाराजांचा मी अपमान केला, अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेले नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही.

बाबासाहेब पुरंदरेंसोबत तुम्ही कधी चर्चा केली केली का? आणि केली तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? असे विचारण्यात आले असता जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

तुम्हाला जेव्हा त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असे विचारले असता ते म्हणाले की, मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.

बाबासाहेब पुरंदरे तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती केलेल्या योगदानाकडे कसे पाहता? असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरंदरे हे सर्वात प्रख्यात समर्थक होते आणि त्याबद्दल ते बराच काळ आदरणीय होते. 18 व्या आणि 19 व्या शतकातील राजकीय लिखाणावरुन आज त्यांच्यावर टीका केली जात आहे, जेव्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांना काही ब्राह्मणांनी खरे क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मराठा आणि ब्राह्मण इतिहासाच्या लेखनात वाद निर्माण झाला.

पुस्तकाबाबतच्या वादग्रस्त बातम्या जवळपास दीड दशकांनंतरही वाचून तुम्हाला काय वाटते? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचे साधन झाले आहे.