पंतप्रधान मोदींसोबत केली दोन विषयांवर चर्चा – शरद पवार


नवी दिल्ली – आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. यानंतर या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. अशातच दिल्लीत पत्रकार परिषद घेत या बैठकीत काय चर्चा झाली यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत दोन विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले. यात पहिला विषय महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीच्या मंजुरीचा विषय आणि दुसरा संजय राऊत यांचा आहे.

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत मी दोन विषयांवर चर्चा केली. एक मागील दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नसल्यामुळे या मतदारसंघांमधील प्रतिनिधींच्या जागा मागील दोन अडीचवर्षांपासून रिक्त आहेत.

मी पंतप्रधान मोदींसोबत महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांबाबत चर्चा केली नाही. यातील केवळ एका प्रकरणावर मी त्यांच्याशी चर्चा केली. हे प्रकरण एका पत्रकाराशी संबंधित आहे. त्या पत्रकाराचे नाव आहे संजय राऊत. संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत, पण ते महाराष्ट्रातील सामना वर्तमानपत्राचे संपादक देखील आहेत. परवा त्यांचे फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमीन ईडीने जप्त केल्या आहेत. हा अन्याय आहे. आम्ही ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.

आमचे दोन विषय आम्ही पंतप्रधान मोदींच्या कानावर घातले आहेत. त्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली नाही. मला आशा आहे की या विषयांवर ते गंभीरपणे विचार करतील आणि निर्णय घेतील, असेही पवारांनी नमूद केले.