मनोज मुंतशिर यांचे मोठे वक्तव्य; ताजमहाल प्रेमाचे प्रतिक नाही


मुघल शासकांना बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशिर यांनी लुटारु म्हटले आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आयोजित गौरव दिवस कार्यक्रमात मुघलांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी यावेळी आपल्याला चुकीचा इतिहास शिकवण्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्याला सांगण्यात आले की, शेरशाह सुरी, अकबर आणि खिलजी यांच्यासारखे शासक नसते, तर आपण झाडांची पाने लावून नाचलो असतो, पण या मुर्खांना कोणा सांगणार की यांच्या आधी येथे मोहेंजदडो पण होते, असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित लोकांना त्यांनी सांगितले की, जेव्हा हजारो वर्ष आधी मुघल नव्हते, तेव्हा आमच्याकडे महाकाल मंदिर तयार झाले होते. २ विटाही जोडणे मुघलांनी शिकलेले नव्हते, तेव्हा आमच्या क्षत्रिय राजांनी उभारलेली मंदिरे होती. आमच्याकडे अजंठा आहे, एलोरा आमच्याकडे आहे आणि कोणार्कही आहे.

तुम्हा लोकांना कदाचित माहिती नाही, पण आपल्या देशात जेव्हा ३५ लाख लोकांनी उपासमारीमुळे आपला जीव गमावला होता, तेव्हा एक बादशाह तेव्हाचे नऊ कोटी रुपये एका थडग्यावर खर्च करत होता. देशाची उपसमार त्या नऊ कोटी रुपयांनी थांबली असती, असे यावेळी त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, आपण एका बाजूला विक्रमादित्य यांना पाहिले आणि एका बाजूला महान लुटारु, दरोडेखोरांनाही पाहिले, हे आपले दुर्भाग्य आहे. ताजमहाल बनवला तर ठीक आहे, पण आता आपल्याला तो प्रेमाचे प्रतिक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या गरिबीची या राजांनी खिल्ली उडवली आणि आता त्याला प्रेमाचे प्रतिक म्हणत असल्याचेही ते म्हणाले.

प्रेमाचं प्रतिक जाणून घ्यायचे असेल, तर चित्तोड किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या, जिथे माता पद्मिनीने राजा रतन सिंह यांच्यासाठी अग्नीत स्वत:ला झोकून दिले. प्रेम समजून घ्यायचे असेल तर प्रभू श्रीरामाने सीतेसाठी समुद्रात पूल उभारला त्याचा अभिमान बाळगा. हे प्रेमाचे प्रतिक असल्याचे मनोज मुंतशिर म्हणाले.

त्यांनी यावेळी सलीम-अनारकली आणि जोधा-अकबर यांच्या प्रेमाच्याही खोट्या गोष्टी सांगितल्या जात असल्याचे म्हटलं. या सर्व दंतकथा आता मिटवण्याची वेळ आली आहे. तुमचे नायक तुमच्याकडे आहेत आणि आता असे मागितलेले नायक नकोत. प्रेम शिकायचे असेल, तर प्रभू श्रीरामाककडून शिका असा सल्ला त्यांनी दिला.