मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावले खडे बोल


मुंबई – मुंबईत मराठी भाषा भवन केंद्राच्या भूमिपूजनाच्यावेळी बोलताना अजित पवार यांनी मराठी भाषाविरोधकांना खडे बोल सुनावले. मुंबईत यायचे, दोन पैसे कमवायचे, त्यानंतर आपल्या राज्यात हे पैसे पाठवायचे आणि वर मराठीला विरोध करायचा, असे करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रात राहायचे, मराठी भाषेला विरोध करायचा हे नैतिक ढोंग काही जण करतात. येथे राज्यात येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला, माणसाला विरोध का करता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत या मातीचे ऋण विसरू नका, असेही आवाहन त्यांनी केले. दुकानांवर मराठी भाषेचे फलक लावावे, यासाठी सरकारने कायदा केला. पण, त्याविरोधात न्यायालयात जाणाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावले. येथे येऊन पैसे कमावयचे आणि मराठी पाट्यांसाठी विरोध का करायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पवार यांनी आपल्या कुटुंबियांना मराठी शिकवावे, असेही म्हटले. राज्याचे सनदी अधिकारी भूषण गगराणी हे मराठीमधून आयएएस झाल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. मराठी भाषा भवनासाठी जेवढ्या निधीची आवश्यकता आहे, तेवढा निधी देण्याची तयारी सरकारची असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. मराठी भाषा भवनासाठी सरकार प्रयत्न करत राहिले. अनेक अडचणीही समोर आल्या, पण आता मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र मुंबईत उभे राहत असून नवी मुंबईत उपकेंद्र उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा भवनासाठी जागा देणाऱ्यांचेही आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मराठी भाषा म्हणजे गुदगुदल्या करत शाल जोडे मारण्याची भाषा असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही मराठी भाषा चांगली असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले. आता दोन माणसे भेटली की कसे बोलतात ते आपल्याला माहीत आहे. सुरुवात इंग्रजीतून होते, मग ते हिंदीत बोलतात त्यानंतर ते मराठीत बोलतात, असेही अजित पवार यांनी म्हटले. आधी कुटुंब मोठे होते, आजी आजोबा एकत्र असायचे पण काळाच्या ओघात आता कुटुंब छोटे झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.