असा असावा मधुमेहींचा सकाळचा नाश्ता


आपल्या आहारामध्ये सकाळच्या नाश्त्याला मोठे महत्व आहे. वास्तविक दिवसभरामध्ये केल्या जाणाऱ्या तीन भोजनांपैकी हे एक भोजन आहे. तरीही याला इतर दोन भोजनाच्या मानाने अधिक महत्व दिले जाण्यामध्ये कारणही तसेच आहे. रात्रीच्या भोजनानंतर झोप, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण झोपेतून उठेपर्यंत सुमारे आठ ते दहा तासांचा अवधी मध्ये गेलेला असतो. या वेळामध्ये आपल्या शरीराच्या सर्व क्रिया आणि अवयव शिथिल झालेले असतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ल्या गेलेल्या अन्नामुळे शरीरातील अवयव पुन्हा वेगाने सक्रीय होत असून, दिवसभराच्या कामासाठी आवश्यक असणारी उर्जा या भोजनाच्या द्वारे शरीराला मिळत असते. मात्र या भोजनामुळे शरीराच्या ब्लड शुगर लेव्हल्समध्येही वाढ होत असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी नाश्ता करावा का, आणि नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खावेत याचा विचार करणे अगत्याचे आहे.

२०१९ सालच्या ‘जर्नल ऑफ न्युट्रीशन’ मध्ये प्रसिद्ध केल्या गेलेल्या रिव्ह्यू स्टडीच्या अनुसार दररोज सकाळी नाश्ता न करणाऱ्या व्यक्तींना टाईप -२ डायबेटीस होण्याचा धोका अधिक संभवतो. तसेच ज्यांना टाईप-२ डायबेटीस असून त्या व्यक्तींनी एखाद्या दिवशी सकाळचा नाश्ता घेतला नसेल त्या दिवशी तर दुपारच्या भोजनाच्या वेळी त्यांच्या ब्लड शुगर लेव्हल्समध्ये एरव्हीपेक्षा सुमारे ३७ टक्यांयानी वाढ झालेली असते. वाढलेल्या ब्लड शुगर लेव्हल्स कमी करण्याकरिता अनेक मंडळी दुपारच्या किंवा रात्रीच्या भोजनामध्ये कर्बोदकांचे सेवन कटाक्षाने टाळतात.

पण मुळात या ब्लड शुगर लेव्हल्स केवळ कर्बोदाकांच्या सेवनाने वाढलेल्या नसून, सकाळचा नाश्ता टाळल्याने वाढल्या आहेत, हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. सकाळचा नाश्ता टाळल्याने संपूर्ण दिवसभरामध्ये ब्लड शुगर लेव्हल्समध्ये चढउतार सुरु रहात असल्याचे विज्ञानाने सिद्ध केले आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता अतिशय आवश्यक आहे. तसेच जे अन्नपदार्थ ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असणारे आहेत, त्यांचा आहारामध्ये समावेश असावा. हे पदार्थ हळू हळू पचत असल्याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हलस एकदम वाढू देत नाहीत. त्यामुळे मधुमेहींनी सकाळच्या नाश्त्यासाठी अश्या अन्नपदार्थांचा वापर करावा.

सकाळचा नाश्ता आवश्यक आहे, हे तर झालेच, पण त्याचबरोबर दिवसभरातील या महत्वाच्या भोजनामध्ये काय खाल्ले जाणे योग्य आहे याचा विचार करणेही महत्वाचे आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये मैदायुक्त, प्रोसेस्ड अन्नपदार्थ शक्यतो टाळले जावेत. त्याऐवजी नाश्त्यामध्ये ताजी फळे, भाज्या, पनीर, सुकामेवा, यांचा समावेश करणे योग्य ठरते. ताज्या फळांमध्ये देखील जास्त प्रमाणत शुगर्स असलेली फळे टाळावीत.

सकाळच्या नाश्त्यामध्ये ताजे दही, ताक, यांचा ही समावेश अवश्य असावा. तसेच नाचणीचे आंबील, किंवा निरनिराळ्या डाळी अथवा कडधान्ये वापरून बनविलेले धिरडे यांसारखे पदार्थही नाश्त्यामध्ये समाविष्ट करता येतील. पालेभाज्या, एखादे फळ, आणि लो फॅट दुध वापरून साखर न घालता बनविलेली स्मूदीदेखील उत्तम आहार आहे. यामुळे शरीराला आवश्यक ती सर्व पौष्टिक तत्वे आणि फायबरही मुबलक मात्रेमध्ये मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment