टास्क फोर्ससोबत चर्चा झाल्यानंतर लवकरच राज्यातील पहिली ते चौथी शाळा सुरु होण्याची शक्यता


मुंबई – राज्यातील शाळा, महाविद्यालय 4 ऑक्टोबरला सुरु झाल्यानंतर आता लवकरच प्राथमिक शाळाही सुरु होणार असल्याचे संकेत महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत. सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोरोना टास्क फोर्स सोबत चर्चा करून पहिली ते चौथीच्या शाळा लवकरच सुरू करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल जवळपास सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करत असताना जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली. कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा आणि त्याअनुषंगाने तयारी, लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.

जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर या बैठकीत जोर दिला. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोरोना टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले.

शाळांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली. हा सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरला सुरू झाल्या. राज्यभरात या निमित्ताने शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. यात 8वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. तर 20 ऑक्टोबरपासून वरिष्ठ महाविद्यालये देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.