केंद्राने सिलेंडरचे भाव लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून वाढवले – यशोमती ठाकूर


मुंबई – देशात इंधनासोबतच घरगुती गॅस सिलेंडर, डाळी, भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रात महागाई वाढवणारे सरकार सत्तेत आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळे काही महाग झाले आहे. अच्छे दिन आणणारे लोक महागाईचे दिन आणत आहेत. यावर मी काय बोलू?,” असे म्हणत ठाकूर यांनी उपरोधिक पद्धतीने महागाईवर टीका केली आहे. सिलेंडरचे भाव यासाठी वाढवले आहेत, कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलाचे भाव यासाठी वाढले आहेत कारण लोकांचे आरोग्य व्यवस्थित रहावे. डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढवले आहेत की कोरोना काळात लोकांनी बाहेर पडू नये. असे स्पष्टीकरण केंद्र देणार असेल, तर यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.