राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले, परमबीर सिंह यांच्यावर कारवाई न करण्याचे आश्वासन आता पाळता येणार नाही


मुंबई – अॅट्रॉसिटीचे गुन्हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. पण नेमके परमबीर सिंह कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आज परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने परमबीर सिंह याच्यावर कारवाई न करण्याचे आश्वासन आता पाळले जाण्याची शाश्वती देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या आरोपांनंतर या प्रकरणावर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर अनेक आरोप खुद्द परमबीर सिंह यांच्यावर देखील झाले. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. पण, परमबीर सिंह यांना समन्स बजावून देखील ते अद्याप समोर आलेले नसल्यामुळे परमबीर सिंह बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडला आहे.

परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याविषयी अद्याप कोणतीही माहिती नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई न करण्याचे दिलेले आश्वासन राज्य सरकारला पाळता येणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली आहे. पण, परमबीर सिंह यांची बाजू न्यायालयासमोर मांडणारे वकील महेश जेठमलानी यांनी मात्र, त्यांना अजून फरार घोषित करण्यात आलेले नाही, असे यावेळी सांगितले आहे.